Chhatrapati Sambahjinagar : छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नवी डेडलाईन दिली आहे. मुंबईत बोलावण्यात आलेल्या बैठकीत फडणवीस यांनी योजनेचा संपूर्ण आढावा घेत ऑक्टोबर अखेरपर्यंत योजना पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराची पाणीपुरवठा योजना सर्व तांत्रिक अडथळे दूर करून येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू करावी. तसेच योजनेतील प्रलंबित कामे पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने तातडीने काम करावे, असे निर्देश फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत दिले. पाणीपुरवठ्यासाठी जॅकवेलचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून पाणी उपसा सुरू करावा.
26 एमएलडी पाणीपुरवठा करणारा टप्पा जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अपूर्ण कामे लवकर व्हावीत यासाठी ठेकेदारास आवश्यक त्या परवानग्या द्याव्यात.पाईपलाइनच्या कामात गॅप आहेत, ते 15 जूननंतर शटडाउन घेऊन ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करावेत. पाणी टाक्यांची कामे ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान पूर्ण करून कार्यान्वित करावीत. यासाठी येणाऱ्या अडचणींवर एमजेपी आणि महानगरपालिका समन्वयातून काम करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) सांगितले.
महानगरपालिकेला 822 कोटींचा कर्ज निधी तातडीने मंजूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सामाजिक न्याय मंत्री आणि पालकमंत्री संजय शिरसाट, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे यांच्यासह संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आता वेग येणार का?
छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न सध्या चांगलाच गाजतो आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी योजना रखडल्याचे खापर एकमेकांवर फोडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिकेवर हल्लाबोल मोर्चा काढत पाणी कधी देणार? असा जाब मुख्यमंत्री आणि राज्यातील महायुती सरकारला विचारला होता. 1680 कोटी रुपयांची योजना आता पावणे तीन हजार कोटींवर पोचली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज योजनेच्या कामाचा आढावा घेतला. सध्या संभाजीनगरच्या नागरिकांना दहा ते बारा दिवसांनी पाणी मिळते. यावरून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सत्ताधारी आणि विरोधकांना ते जबाबदार ठरवत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत पाण्याचा मुद्दा प्रामुख्याने राजकीय पक्षांना अडचणीचा ठरणार आहे. यावर मात करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तरी योजनेच्या कामाला वेग येईल का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.