Chhatrapati Sambhajinagar : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक चार महिन्यात घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 'लबाडांनो पाणी द्या' म्हणत जल आंदोलन सुरू आहे. 33 दिवस चालणाऱ्या या आंदोलनाचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत 16 मे रोजी निघणाऱ्या 'हल्लाबोल मोर्चा'ने होणार आहे. त्या आधीच काँग्रेसने 15 मे रोजी 'पाणी बाणी' म्हणत महापालिकेवर धडकण्याची तयारी सुरू केली आहे.
काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही महापालिकेसमोर जाऊन पाण्यासाठी आंदोलन केले होते. आता काँग्रेसनेही (Congress) स्वतंत्रपणे आंदोलनाचा घाट घालत महाविकास आघाडी आगामी महापालिका जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कशी वाटचाल करणार? आहे हे यावरून स्पष्ट होते. छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांना दहा ते पंधरा दिवसांनी पाणी मिळते.
50 किलोमीटर अंतरावर जायकवाडी सारखे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण पाण्याने भरलेले असताना संभाजीनगरकरांना (Chhatrapati Sambhajinagar) मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वाट पाहावी लागते. 2740 कोटी रुपयांची पाणी योजना शहरासाठी मंजूर झालेली आहे. तिचे कामही सुरू आहे, परंतु प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि कंत्राटदाराकडे असलेले अपुरे मनुष्यबळ यामुळे आणखी किमान दोन वर्ष योजना पूर्ण व्हायला लागतील, अशी परिस्थिती आहे.
पाच वर्ष रखडलेल्या महापालिका निवडणुका येत्या चार महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत जन आंदोलन सुरू केले. 13 एप्रिल पासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा 16 मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत निघणाऱ्या मोर्चाने समारोप होणार आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या तीनही पक्षांनी एकत्रितपणे लढल्या. लोकसभेत संभाजीनगर वगळता मराठवाडा आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कमालीचे यश मिळाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र बाजी पलटली आणि महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. विधानसभेत झालेल्या दारूण पराभवानंतर महाविकास आघाडी आता फक्त कागदावर उरल्याचे चित्र आहे. तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये संवाद आणि समन्वय नसल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये या तीनही पक्षांची भूमिका स्वतंत्र असणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत महापालिकेच्या सत्तेत आणि सर्वात मोठा पक्ष शिवसेना होता. राष्ट्रवादीचे चार तर काँग्रेसचे दहा नगरसेवक त्यावेळी निवडून आले होते. महापालिकेच्या राजकारणात मर्यादित ताकद असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने फुटीमुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संभाजीनगरच्या पाणी प्रश्नासाठी काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करत एकला चलो ची भूमिका घेतल्याची दिसून आले.
त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत काँग्रेसनेही पाणी प्रश्नावर गुरुवार 15 मे रोजी दुपारी दोन वाजता महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलनाची घोषणा केली आहे. पाणी बाणी, आपल्या हक्काच्या पाण्यासाठी जन आंदोलन, असे म्हणत आपल्या हक्काच्या लढाईत सामील व्हा, असे आवाहन शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने केले आहे. विशेष म्हणजे 16 मे रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकापासून भव्य अशा हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चाच्या आदल्या दिवशीच काँग्रेसने आंदोलनाची घोषणा करत आपला मार्ग वेगळा असल्याचे संकेत दिले आहेत. संभाजीनगरकरांच्या पाणी प्रश्नावर महाविकास आघाडीने एकत्रितपणे मोठे जन आंदोलन उभारून प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावणे अपेक्षित असताना तीनही पक्षांनी एकाच प्रश्नावर स्वतंत्र आंदोलनाचा निर्णय घेत महापालिका निवडणुकीत आपले मार्ग स्वतंत्र असणार आहेत, हे अधोरेखित केले आहे का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.