Maratha Reservation News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमदार धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे. बीड जिल्ह्यात पोलीसांना आडनाव न लावण्याचा नियम केल्यावरून धनंजय मुंडे यांनी कुठे आहे सामाजिक समता? अशी उद्विग्न भावना व्यक्त केली होती. तसेच शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठ्यांनीच साजरी करायची का? महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठीच उभे केले होते का? अठरा पगड जातीसाठी उभं केलं होतं, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती.
यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना माध्यमांनी प्रश्न विचारला तेव्हा, धनंजय मुंडे यांच्यावर बोलणे म्हणजे वर्ष वाया जाणे आहे. ते बोलायच्या कामाचे नाही. त्यांनी तिकडे मजा करावी, राजकारण करा, पण मराठ्यांच्या वाट्याला गेल्यास मात्र सुट्टी नाही, अशा शब्दात इशारा दिला. मराठा आरक्षणाचा लढा आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणापासून मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात संघर्ष सुरू आहे. या वादाला मराठा विरुद्ध ओबीसी असाही रंग दिला गेला.
मनोज जरांगे पाटील आणि भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी राज्यभरात काढलेल्या न्याय सभांमुळेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे मंत्रीपद गेल्याचे बोलले जाते. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात पाच दिवस बेमुदत उपोषण करत सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले. मराठा आरक्षणा संदर्भात जरांगे पाटील यांनी केलेल्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य करत त्याचे अध्यादेश काढले, अंमलबजावणीही सुरू केली. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये पुन्हा एकदा जिल्ह्यातील सामाजिक वातावरणावर भाष्य करताना मराठा समाजावर निशाणा साधला. याकडे मनोज जरांगे पाटील यांचे लक्ष वेधले असता त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बोलणे म्हणजे वेळ वाया घालवणे असल्याचा टोला लगावला. शिवाय त्यांनी त्यांचे राजकारण करावे, मजा करावी पण मराठ्यांच्या वाट्याला जावू नये, नसता त्यांना सुट्टी देणार नाही, याचा पुनरुच्चार केला.
आम्ही आरक्षण मिळवले आहे, सगळा समाज खूश आहे. त्यामुळे आता मरावाडा, पश्चिम महाराष्ट्र असा कुठलाही दौरा काढणार नाही. माझे मराठा समाज बांधवांनाही आवाहन आहे की, त्यांनी हार, फुलं, पुष्पगुच्छ, शाल यावर वायफळ खर्च करू नये. त्याऐवजी गरीबांना मदत करू, मला फक्त घरातले कुंकू लावले तरी चालेल, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केले. आम्ही आरक्षण मिळवले आहे. जीआर निघाला ही छोटी गोष्ट नाही.
मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढा, कल्याण होईल तुमचं, असा सल्ला त्यांनी ओबीसींच्या नेत्यांना दिला. आम्हाला आरक्षण मिळाले त्यामुळे आता लढायला काय बाकी आहे? सरकारने शब्द दिलाय, सुधारित जीआर काढणार. इथ आल्यास तुम्हाला काय अडचणी येतात. तुम्ही जीआर कितीही चांगला काढा, अडचणी येतात. सुधारित जीआर काढावाच लागतो. जीआर काढल्यास बदल करावा लागतो, असे म्हणत त्यांनी जीआरवर टीका करणाऱ्यांना खडसावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.