Dharashiv News : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील पाटसांगवी (ता. भूम) येथे मंगळवारी मतदान सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याचा भोसकून खून करण्यात आला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात होते. ही हत्या राजकीय पार्श्वभूमीतून झाला नसल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत असला तरी या हत्येचे कारण पाहता हा खून राजकीय पार्श्वभूमीतूनच झाल्याची चर्चा घटनास्थळी दबक्या आवाजात सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मंगळवारी वेगवेगळी दोन पत्रके प्रसिद्ध करण्यात आल्याने या चर्चेला दुजोरा मिळत आहे.
धाराशिव लोकसभा (Dharashiv Loksabha) मतदारसंघातील पाटसांगवी (ता. भूम) या गावात मतदानाच्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास एकाचा भोसकून खून करण्यात आला. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात असून, खून झालेल्या कार्यकर्त्याचे नाव समाधान पाटील असे आहे. ते ठाकरे गटाचे असल्याचे सांगितले जात आहे. खुनाचे कारण वैयक्तिक की राजकीय हेही स्पष्ट झाले नव्हते. (Dharashiv Lok Sabha News)
भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे मंगळवारी सकाळी गौरव नाईकनवरे हा मतदान करण्यासाठी गावातील बूथ क्रमांक १५४ येथे गेला होता. त्याठिकाणी त्याची मतदान करण्यासाठीची पूर्ण प्रक्रिया कक्षातील अधिकाऱ्यांनी पूर्ण केली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याने मतदान करण्यास नकार दिला. यावेळी त्याठिकाणी गौरवने गोंधळ घातला. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. गौरव नाईकनवरे हा शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. या गोंधळानंतर तो बूथ असणाऱ्या शाळेच्या परिसरात आला. त्या ठिकाणी मतदान केंद्रावर पोलिंग एजंट असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते भारत पाटील यांच्याशी त्याची शाब्दिक चकमक व बाचाबाची झाली.
या सर्व प्रकरणानंतर गौरव नाईकनवरे हा ग्रामपंचायत समोरील चौकात आला. यावेळी भारत पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य समाधान पाटील व शंकर शिंदे यांनी भारत पाटील यांच्यासोबत वाद का घातला याचे कारण विचारले. यामुळे या तीन जणात चौकात बाचाबाची झाली. त्यामुळे या ठिकाणी मोठा जमाव जमला होता. यावेळी गावातील काही जणांनी त्यांची समजूत काढत प्रकरण मिटविले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या घटनेनंतर आरोपी गौरव नाईकनवरे हा त्याच्या घरी गेला. त्याने घरी जाऊन पोत्यातून धान्य काढण्यासाठीच्या बंब आणला. त्याने त्या ठिकाणी असलेल्या समाधान पाटील यांच्या पोटात पोत्यातून धान्य काढण्यासाठीचा बंब भोकसला. यामध्ये समाधान पाटील हा जागीच कोसळला. तर शंकर शिंदे हे या हल्ल्यात जखमी झाले होते. या घटनेनंतर दोघांनाही तातडीने बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी समाधान पाटील यास तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. या हल्ल्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नव्हते.
मृत समाधान याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. तो गावामध्येच किराणा व हॉटेल व्यवसाय करत होता. त्यामुळे ही घटना नेमकी राजकीय कारणामुळे इतर काही कारणामुळे घडली ह्याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेनंतर आरोपी व त्याचे चुलते हे गावातून पळून गेले आहेत.
या घटनेतील मयत समाधान पाटील हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी संबंधित आहे. तर ज्याच्या सोबत आरोपीची बाचाबाची झाली ते भारत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आहेत. ते मतदान केंद्रावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे पोलिंग एजंट म्हणून काम पाहत होते. तर या घटनेतील आरोपी हे शिवसेना शिंदे गटाशी संबंधित आहेत.
त्यामुळे पोलिसांकडून जरी हे प्रकरण राजकीय नसल्याचे सांगितले जात असले तरी हे प्रकरण पूर्णता राजकीय असल्याचे जाणवत आहे. दरम्यान, या घटनेनंतर काहीवेळ मतदानाची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा मोठ्या संख्येने दाखल झाला. त्यानंतर पुन्हा मतदान सुरू झाले. हल्लेखोर फरार झाल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर पाटसांगवी येथे माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आदींनी भेट दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळाला भेट देत घटनेची माहिती घेतली. पोलीस यंत्रणेकडून याबाबत पत्रक काढण्यात आले आहे. त्यामध्ये हा खून राजकीय वैमनस्यातून नव्हे तर व वैयक्तिक वादातून हा खून झाले असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणी मंगळवारी दुपारी भूम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांनी आरोपी व फिर्यादी यांच्यातील वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला असून या प्रकरणातील हल्ल्यात दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, तर आरोपी पळून गेले असल्याचे पत्रक काढले होते
या हत्येच्या प्रकरणानंतर या ठिकाणी शांतता आहे. याठिकाणी पोलिसांनी पथ संचालन केले. या घटनेनंतर पाटसांगवी येते शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर रात्री उशिरा पॊलिसांनी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीत गौरव नाईकनवरे यांनी भोसकले तर अप्पाराव नाईकनवरे, राजकुमार नाईकनवरे, दत्तात्रय नाईकनवरे या आरोपीच्या पुतण्याने समाधानाचे हात पकडले तर गौरवने चाकूने हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी शंकर शिंदे यांच्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास गुन्हा नोंद झाला आहे.