

Sanjay Shirsat: शिवसेनेचे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सगळं काही आलबेल नाही. या पक्षातील अनेक आमदार नाराज आहेत, ते आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर शिरसाट यांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्याची धमकी दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतरही संजय शिरसाट हे त्यांच्या पक्षाबद्दल जाहीरपणे विधाने करत आहेत. अखेर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिरसाट यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यानंतर शिंदे यांनी फोन करून संजय शिरसाट यांना तंबी दिल्याची माहिती आहे. महायुतीत फूट पडेल असे कोणतेही व्यक्त करू नका, अशा स्पष्ट सूचना शिरसाट यांना देण्यात आल्या आहेत. महायुतीतील तीनही पक्षांना सोबत घेऊन आपल्याला सरकार चालवायचे आहे, असे शिंदे यांनी त्यांना निक्षूण सांगितले.
संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांबद्दल केलेल्या दाव्याचे पडसाद महायुतीत उमटले आहेत. शिरसाट यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र आक्षेप घेतला. 'संजय शिरसाट आमच्या पक्षावर कसे बोलू शकतात'? असा थेट सवाल त्यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांना विचारला होता. तसेच, यापूर्वी समज दिल्यानंतरही शिरसाट पुन्हा राष्ट्रवादीवर भाष्य करत आहेत. यापुढे त्यांनी असे वक्तव्य केल्यास आम्ही त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करू, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला होता.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला होता. या विधानाबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी तुमची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली याकडे जेव्हा माध्यमांनी संजय शिरसाट यांचे लक्ष वेधले. तेव्हा मी काय चुकीचं बोललो? महायुतीतील घटक पक्षाच्या आमदार, मंत्र्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहू नये का? तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ का घेता? त्यांना काय तक्रार करायची ते करू द्या, मी जे बोललो ते बोललो, असे म्हणत शिरसाट आपल्या विधानावर ठाम होते.
त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेत संजय शिरसाट यांना फोनवरून त्यांनी केलेल्या विधानाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटामध्ये अंतर्गत कलह असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना डावलून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे जात असल्याच्या चर्चांना एका व्हायरल पत्रामुळे उधाण आले होते. त्यातच सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले.
याच घडामोडींवर संजय शिरसाट यांनी 'कोणाची काही चूक झाली या वादात्मक गोष्टी आहेत. अंतर्गत गोष्ट वेगळी, पक्षातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही लोकं आमच्या संपर्कात असून आमच्याशी बोलतात. कोणाच्या नेतृत्वात काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडला आहे हे नाकारता येत नाही, त्यांच्या पक्षात काय घडतंय हे काही दिवसांत कळेल', असे म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही अशा प्रकारे मित्र पक्षाबद्दल चुकीचे दावे करणे योग्य नाही. ही काही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही. संजय शिरसाट किंवा मी जो कोणी पक्षाचा अधिकृत प्रवक्ता, नेता आहे त्याला जोपर्यंत आमचे मुख्य नेते एखाद्या विषयाबद्दल ही लाईन घेऊन बोला, असे सांगत नाही, तोपर्यंत ती भूमिका पक्षाची नसते. संजय शिरसाट यांच्या संपर्कात कोण आमदार आहेत? हे तेच सांगू शकतील. परंतू हा त्यांचा दावा वैयक्तिक असू शकतो, ती काही पक्षाची भूमिका नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.