

Hingoli News : महायुतीचे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार बाबूराव कदम यांच्याविरोधात भाजपच्या रामदास पाटील, योगी शाम भारती महाराज आणि अॅड. शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या बंडखोरांची रविवारी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी हिंगोलीत येऊन भेट घेतली होती.
रामदास पाटील यांच्याशी दोन तास बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर अखेर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रामदास पाटील (Ramdas Patil ) यांनी माघार घेतली आहे. भाजप (Bjp) अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगी श्याम भारती महाराज आणि अॅड. शिवाजी जाधव (Shivaji Jadhav) यांचे मात्र अद्याप ठरले नाही. माघार घेण्यासाठी तीन वाजेपर्यंतची वेळ असल्याने शेवटच्या क्षणी हे दोघे माघार घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Hingoli Loksabha Constituency)
गिरीश महाजन यांनी रामदास पाटील यांना महायुतीच्या उमेदवाराविरुद्धची बंडखोरी आपणास भविष्यात महागात पडू शकते, असा सूचक इशारा कालच्या प्रदीर्घ चर्चेत दिला होता. त्याचा परिणाम आज पाटील यांच्या माघारीतून दिसून आला. आता भारती आणि जाधव यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या दबावाला बळी पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलल्याचा आरोप केला जातो. भाजपने हेमंत पाटील यांना बदलण्याची मागणी केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उमेदवार बदलल्यानंतर ही जागा भाजपलाच सोडा, असा आग्रह स्थानिक नेत्यानी धरला होता. आपली मागणी मान्य होणार नाही हे लक्षात आल्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु हे दबाव तंत्र बंडखोरांच्याच अंगलट आले. रामदास पाटील सुमठाणकर, श्याम भारती महाराज व वसमतचे अॅड. शिवाजी जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
या तीनही बंडखोरांची भेट घेत गिरीश महाजन यांनी त्यांना योग्य समज दिली होती. अखेर त्यांची शिष्टाई फळाला आली असेच म्हणावे लागेल. कारण रामदास पाटील सुमठाणकर यांनी माघार घेत अर्ज परत घेतला आहे. त्यामुळे महायुतीचे बाबूराव कदम यांचा जीव भांड्यात पडला असणार. श्याम भारती, जाधव हेही थोड्याच वेळात माघार घेतील, असे सांगितले जाते. भाजपच्या बंडखोरांनी माघार घेतल्यास महायुतीला दिलासा मिळणार आहे.
(Edited By : Sachin Waghmare)
R