

Raju Shetty News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला मराठवाड्यात असलेला विरोध दिवसेंदिवस वाढतच आहे. सुपीक जमीनी या महामार्गात जात असल्याने नांदेड, परभणी, लातूर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर असले तरी अनेक जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार देखील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. या शिवाय स्वाभीमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष व इतर शेतकरी संघटना देखील शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री रासपचे महादेव जानकर यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील पोखरणी नरसिंह येथे नुकतीच एल्गार परीषद पार पडली. यावेळी राजू शेट्टी यांनी सध्याचे सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट आहे. या सत्तेत ढग, पेढारी बसलेले आहेत, असा आरोप केला.
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी एकवटले आहेत. शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंच ही जमीन दिली जाणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेच्या उद्घाटन राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. एल्गार परिषदेला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर माजी खासदार तुकाराम रेंगे माजी आमदार विजय गव्हाणे किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर व इतरांची उपस्थिति होती.
मोदी- शहा यांना सत्तेचा अंहकार
माजी मंत्री महादेव जानकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना त्यांना सत्तेचा अहंकार आला आहे, असे सांगत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात ठराव घ्यावेत, असे आवाहन केले. एकीकडे सरकारच्या तिजोरीत ठणठणात आहे, पण शक्तीपीठ महामार्गावर एक लाख वीस हजार कोटी रूपयांचा खर्च केला जात आहे.
शेतकरी सरकारच्या विरोधात ठामपणे उभे असून प्रसंगी छातीवर गोळ्या झेलण्याची आमची तयारी असल्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राजन क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात दिला. मराठवाड्याच्या विकासासाठी शक्तीपीठाची गरज नसून सिंचनाची गरज असल्याचे कॉम्रेड अजय बुरांडे यांनी सांगीतले. तर ही लढाई शेतकर्यांच्या बांधावरील असून ती शेतकरी जिंकणार आहेत, असा विश्वास फोंडे यांनी व्यक्त केला.
शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना शेतकर्यांवर हा महामार्ग लादला जात आहे असा आरोप माजी खासदार तुकाराम रेंगे यांनी केला. या महामार्गाच्या माध्यमातून शेतकर्यांना भूमिहीन करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप माजी आमदार विजय गव्हाणे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.