Maharashtra Election Results : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन शिवसैनिकांत लढत झाली. २०१४ च्या मोदी लाटेत कॉंग्रेसचे राजीव सातव यांनी मिळवलेला विजय वगळता सातत्याने येथे शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला आहे.
यावेळेस शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्याने दोन शिवसैनिकांतच लढत रंगली. यामध्ये ठाकरे गटाचे शिलेदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एक हाती बाजी मारत शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना पराभवाची धूळ चारली. या लढतीचे वेगळे वैशिष्ट म्हणजे आमने-सामने उभे टाकलेले हे दोन्ही उमेदवार विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.
हिंगोलीतील निवडणुकीत सुरुवातीला शिंदे गटाची वाट सुकर वाटत होती. परंतु. ऐनवेळी विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांना भाजपकडून झालेला विरोध, बंडखोरीचा धोका हे लक्षात घेऊन ऐनवेळी हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यामुळे बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली. परंतु ही आदलाबदल शिंदे गटाला महागात पडल्याचे चित्र आहे.
या गोंधळामुळे महायुतीची मजबूत स्थिती असताना त्यांना बॅकफूटवर जावे लागले. त्यामुळे हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश पाटील-आष्टीकर विजयी झाले. त्यामुळे हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलणे हिंगोलीसह यवतमाळ वाशीम मतदारसंघात पथ्यावर पडले. दोन्ही ठिकाणी शिंदे गटाला पराभवाला सामोरे जावे लागेल आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे बाबूराव पाटील कोहळीकर आणि ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यात मुख्य लढत झाली. आतापर्यंत युतीविरुद्ध आघाडी असे लढतीचे चित्र होते. परंतु यावेळी पहिल्यांदाच दोन शिवसैनिक आमने-सामने उभे ठाकले. त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक ओळखणारी ही निवडणूक मानली गेली. सुरुवातीला मतदारसंघातील भाजपचे प्राबल्य, शिंदे गटाचे एक आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हे चित्र पाहता या मतदारसंघात महायुतीचेच पारडे जड मानले जात होते.
या मतदारसंघात खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना मानणारा वर्गही मोठा आहे. एवढी मोठी शक्ती एकवटलेली असताना महाविकास आघाडीचा उमेदवार कितपत टिकेल, असा प्रश्न उपस्थित होत होता. परंतु ठाकरे गटाने निवडणूक रंगात येण्याअगोदर सभा घेऊन वातावरण निर्मिती केल्याने ठाकरे गटात उत्साह संचारला होता. परंतु शिंदे गटासह महायुतीपुढे ठाकरे गट टिकाव धरणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
राजकीयदृष्ट्या हिंगोली मतदारसंघात महायुतीचे पारडे जड वाटते. परंतु ऐनवेळी बदलेला उमेदवार, भाजपमधील खदखद, फोडाफोडीच्या राजकारणामुळे वाढलेला असंतोष यासह शेतकरी, बेरोजगार तरुणांचा प्रश्न आणि मराठा आरक्षण याची झळ महायुतीला याठिकाणी बसली असून पराभवाला सामोरे जावे लागले.