Shivsena News : औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला वाद आता खुलताबादचे रत्नपुर असे नामांतर करण्यावर येऊन थांबला आहे. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबाद चे पूर्वीचे नाव रत्नपुरच होते. शासकीय रेकॉर्डवर तशी नोंद आहे, असा दावा करत मुस्लिम शासकांनी बदललेले नाव पुन्हा दुरुस्त करायचे आहे, असे सांगत खुलताबादच्या रत्नपुर असे नामकरणावर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा छळ आणि अमानुष हाल करून त्यांना ठार मारणाऱ्या औरंगजेबाची (Aurangzeb) कबर उखडून फेका, अशी मागणी महिनाभरापूर्वी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनही झाले, याच मागणीसाठी नागपुरात आंदोलना दरम्यान दंगल उसळली होती. हा वाद शमत नाही तोच औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदलण्याची मागणी समोर आली आहे.
भाजपाचे नवनिर्वाचित आमदार संजय केनेकर यांनी यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्याकडे मागणी केली आहे. या मागणीचा आधार घेत संजय शिरसाट यांनी सुद्धा खुलताबाद, दौलताबाद ही नावे बाद करायची आहेत, असे म्हणत खुलताबादचे रत्नपुर असे नामकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान आज संजय शिरसाट यांनी खुलताबादचे पूर्वीचे नाव रत्नपुर होते, तशी शासकीय दरबारी नोंद असल्याचा दावा करत नावातील ही चूक फक्त दुरुस्त करायची आहे, असे म्हणत या या मुद्द्याला आणखी हवा दिली.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट यांनी इंग्रजांच्या काळात या भागात जो शेतसारा वसूल केला जायचा, त्यात रत्नपुर असेच लिहिलेले आहे, असा दावा करत आम्ही काही नवीन मागतोय अशातला भाग नाही. जसं दौलताबाद याचे आधीचे नाव देवगिरी आहे, या संपूर्ण परिसराला देवगिरी प्रांत असं म्हटलं जायचं, राजा रामदेवराय यांनी हा किल्ला बांधला. औरंगजेबाचे फक्त इथे काहीकाळ राज्य होते, हा दौलताबादचा किल्ला औरंगजेबाने बांधलेला नाही.
त्यामुळे रत्नपुर प्रमाणेच दौलताबादही बाद झाले पाहिजे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. खुलताबादचे आम्ही रत्नपुर असे नामकरण करतोय हे म्हणणे चुकीचे आहे, हे नामांतर नाही तर झालेली चूक दुरुस्त करण्याचा प्रकार आहे. औरंगजेबाची कबर खोदण्याचा आम्ही विषय काढला, त्याचा काही लोकांना त्रास झाला. मग त्यांना जर स्वाभिमान आहे तर आम्ही आमचा स्वाभिमान जागृत करायचा नाही का? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला.
खुलताबादचे रत्नपुर करण्यासाठी जी काही तांत्रिक दुरुस्ती करावी लागेल त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहोत. विधिमंडळात ठराव घेऊन या दुरुस्तीला मान्यता घेऊन हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा लागेल. केंद्राच्या मंजूरीनंतर हे नाव बदलले जाईल. यापूर्वी उस्मानाबादचे धाराशिव, औरंगाबादचे संभाजीनगर आणि अहमदनगरचे अहिल्यानगर याच पद्धतीने झालेले आहे. त्याचप्रमाणे खुलताबादचे रत्नपुर करून केंद्राच्या गॅझेटमध्ये ते आणावे लागेल. त्यानंतरच अधिकृतपणे हा बदल होईल असेही शिरसाट म्हणाले.
काय आहे खुलताबाद- रत्नपुरचा इतिहास?
छत्रपती संभाजीनगर पासून 27 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आणि हिंदूंचे जागृत देवस्थान भद्रा मारुतीचे मंदिर आहे. देशातील तीन निद्रावस्थेतील मारुती मूर्तींपैकी एक खुलताबाद येथे आहे. इस्लामी आक्रमणाच्या आधी हे स्थळ भद्रावती नगरी म्हणून प्रसिद्ध होते. येथील राजा भद्रसेन हा राम भक्त होता. त्याच्या राम भक्तीमुळे येथे भद्रा मारुती आला आणि राहिला, अशी कथा आहे. त्यानंतर मुस्लिम आक्रमणात हे गाव उध्वस्त केले गेले. मंदिराचा विनाश झाला आणि हिंदूंवर अत्याचार झाले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.