Beed News, 8 May : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी जिल्ह्यातील अंबाजोगाईत घेतलेल्या प्रचार सभेत 25 मिनिटे 7 सेकंद भाषण केले. यात त्यांनी 'इंडिया' आघाडी आणि काँग्रेसवर आरोप करण्यात 16 मिनिटं 20 सेकंदांचा वेळ घालविला. तर, 'एनडीए'चा संकल्प व स्वतःची धोरणे पाच मिनिटांत सांगितली.
भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघातील ( Beed Lok Sabha Constituecy ) उमेदवार पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी अंबाजोगाईत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ), उमेदवार पंकजा मुंडे, पालकमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्यासह जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
स्थानिक देवदेवता व मुद्द्यांवर 1 मिनिटं 15 सेकंद, पंकजा मुंडे आणि दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आठवण यावर 2 मिनिटे 59 सेकंद, 'इंडिया' आघाडीवर आरोप करण्यात 16 मिनिटे 20 सेकंद, 'एनडीए'चा संकल्प सांगण्यात 03 मिनिटे 17 सेकंद, मराठवाडा व महाराष्ट्राचा विकास यावर 02 मिनिटे 12 सेकंद मोदी बोलले आहेत.
"'इंडिया' आघाडी पहिल्या टप्प्यात स्वस्त, दुसऱ्या टप्प्यात फस्त आणि आता त्यांच्या आशा मावळल्या आहेत. मोदी विकसित भारताच्या मोहिमेवर जात असून त्यासाठी तुमचे आशीर्वाद हवेत. तुमचे व मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आपण कष्ट घेत आहोत. तुम्ही व देशच माझा परिवार आहात. 'इंडिया' आघाडी सत्तेवर आली, तर आर्टिकल्स 370, किसान सन्मान योजना, गरिबांचे मोफत रेशन, पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार अशा योजना रद्द करतील," असा आरोप मोदींनी केला.
"काँग्रेसचे सरकार असताना राम मंदिराच्या बाजूने व शहाबानो तीन तलाक प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यावेळी बैठक घेऊन बदलला होता. मतांसाठी काँग्रेसवाले रामाचा अपमान करीत आहे. 26/11 बाँब स्फोटातील आरोपींना काँग्रेस क्लीनचिट देत आहे. काँग्रेस व दहशतवाद्यांचे नाते आहे की काय, असा प्रश्न विचारत पूर्वी पंतप्रधानाच्या घरात दहशतवाद्यांचे स्वागत होत असे. बाटला हाऊसमध्ये दहशतवादी मारल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान रडत बसल्या होत्या," असा गंभीर आरोपही नरेंद्र मोदींनी केला.
"परत ते दिवस आणण्याची चाल खेळली जात असली, तरी मोदी पहाडासारखा उभा आहे. भारतात धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही, यावर डॉ. आंबेडकर ठाम होते. पण, काँग्रेस दलित, आदिवासीचे व वंचितांचे आरक्षण काढून धर्माच्या नावावर मुस्लिमांना देऊ इच्छित असल्याचे सुतोवाच लालूप्रसाद यादव यांनी केलं आहे. कर्नाटकात ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे. पण, सर्व मुस्लिमांना ओबीसीत समाविष्ट करुन आरक्षणात वाटेकरी केलं आहे," अशी टीकाही मोदींनी केली आहे.
"जोपर्यंत मोदी जिवंत आहे, तोपर्यंत जगातील कुठलीच शक्ती दलित, ओबीसी व वंचितांचे आरक्षण काढून मुस्लिमांना देऊ शकत नाही. खरी राष्ट्रवादी व खरी शिवसेना भाजपसोबत असून नकली पक्ष 'इंडिया' आघाडीसोबत आहेत. काम करायचे नाही आणि करू द्यायचे नाही हे काँग्रेसचे धोरण आहे. बुलेट ट्रेनच्या कामात अडथळा आणणाऱ्या काँग्रेसने आता जाहीरनाम्यात बुलेट ट्रेनचे आश्वासन दिले आहे," असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
"शेतकऱ्यांच्या मेहनतीची आपल्याला जाणीव असून त्यासाठी पीक विमा लागू केली. आता राज्य सरकारदेखील किसान सन्मान निधी देत आहे. मराठवाड्याच्या विकासाची जबाबदारी 'एनडीए'ची आहे. राष्ट्रीय महामार्ग, बीड रेल्वे मार्ग विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. भाजप व 'एनडीए'ला मुंडेंचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यासाठी पंकजा मुंडे यांना विजयी करा," असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.
( Edited By : Akshay Sabale )
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.