Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या 'हम साथ साथ हैं'च्या प्रारंभालाच मिठाचा खडा...!

Ravindra Gaikwad : राज्यातील 36 जिल्ह्यांत एकाच दिवशी होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या कार्यकर्ता मेळाव्यात धाराशिवमध्ये असमन्वयाचे दर्शन घडले.
Ranajagjitsinha patil ,ravindra gaikwad,Tanaji sawant
Ranajagjitsinha patil ,ravindra gaikwad,Tanaji sawantsarkarnaa
Published on
Updated on

शितल वाघमारे

Dharashiv : नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना या प्रमुख तीन बलाढ्य पक्षांसह 14 घटक पक्षांची मोट बांधली जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शक्तिशाली विरोधक आपल्या महायुतीत आला पाहिजे याची सर्व ‘सोय’ सत्ताधार्‍यांनी केली आणि महायुतीने ‘हम साथ साथ है’ची मोहीम सुरू केली. या मोहिमेत राज्यातील 36 जिल्ह्यांत एकाच दिवशी होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या कार्यकर्ता मेळाव्यात धाराशिवमध्ये असमन्वयाचे दर्शन घडले. कारण एकेकाळी नॉट रिचेबलचा धब्बा लागलेले माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना समन्वय समितीच्या नेतृत्वाने बोलण्याची संधीच दिली नाही.

धाराशिव शहरातील स्वस्तिक मंगल कार्यालयात रविवारी महायुतीच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्षातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकेकाळी एकमेकांचे विरोधक म्हणून काम केलेले आहे. आता या कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे आणि लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला सभागृहात पाठवावे, यासाठी चार दिवसांपूर्वी समन्वय समिती स्थापन करण्यात आली.

Ranajagjitsinha patil ,ravindra gaikwad,Tanaji sawant
Lok Sabha Election 2024 : पक्ष एकत्र आले मात्र मुद्दा निघाला मराठा आरक्षणाचा !

या समितीचे नेतृत्व प्रामुख्याने भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्याकडे आहे. समितीत इतर घटक पक्ष व संघटनांचे पदाधिकारीही समाविष्ट आहेत. रविवारच्या मेळाव्यात पहिल्यांदा भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी मनोगत व्यक्त करण्याचा श्रीगणेशा केला. त्यानंतर प्रा. सुरेश बिराजदार, त्या पाठोपाठ आमदार राणाजगजितसिंह पाटील (ranajagjitsinha patil), आमदार ज्ञानराज चौगुले, पालकमंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) यांनी मनोगत व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रा. सुरेश बिराजदार यांचे भाषण सुरू असताना उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले आणि माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचे आगमन झाले. ज्ञानराज चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. मात्र प्रा. रवींद्र गायकवाड यांचे नाव मार्गदर्शन करण्यासाठी घेतले गेले नाही. त्यामुळे त्यांना बोलण्याची संधी न मिळाल्याने सभागृहात चर्चेला उधाण आले. त्यावेळी शिवसैनिक व इतर घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये याची मोठ्या चवीने चर्चा झाली. नोव्हेंबर महिन्यात धाराशिव येथे प्रा. रवींद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन वरिष्ठांनी संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते.

समितीकडे बोलण्याची विनंती...

निवडणुकीच्या दृष्टीने गायकवाड यांनी मतदारसंघामध्ये दौरे व गाठीभेटीही सुरू केल्या होत्या. महायुतीसाठी आपले आगामी प्रयत्न काय असतील, हे सांगण्यासाठी गायकवाड यांनी बोलण्याची विनंती समितीकडे केली. मात्र त्यांना बोलण्याची संधी समितीने दिली नाही! त्यावरून समन्वय समितीच्या या पहिल्याच मेळाव्यात असमन्वयाचे दर्शन घडून आले. याचे परिणाम पुढील काळात काय होणार, हे येणार्‍या काळातच समजून येणार आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com