Shivsena-BJP News : सुरुवातीपासून आगामी महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युती करण्यास इच्छुक असलेले शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून मात्र प्रतिसाद मिळत नाहीये. आमदार संजय केनेकर यांच्यासह काही स्थानिक भाजप नेत्यांना स्वबळाची उबळ आल्याने युतीमधील तणाव वाढला आहे.
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि संजय केनेकर यांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवण्यास सुरवात केली आहे. ज्यांचा हात धरून मोठे झालात, त्यांच्याविरोधात अहंकाराने बोलणे दुर्दैवी, असल्याचे शिरसाट यांनी सुनावले आहे. तर विधानसभेला आम्ही पाया रचला, म्हणून तुम्हाला कळस रचता आला, असे म्हणत केनेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना स्वबळाची पुन्हा उबळ आली असून, एकमेकांवर तोफा डागणे सुरू झाले आहे.
'घमेंड करू नका' या शिवसेनेच्या विधानावर निशाणा साधत (BJP) भाजपने 'आम्ही पाया रचल्यामुळे तुम्ही कळसावर आहात' असे डिवचले होते. त्यावर पालकमंत्री शिरसाट यांनी संजयास्त्र डागत, 'ज्यांचे हात धरून मोठे झालात त्यांच्याविरोधात अहंकाराने बोलत आहात, इतका अहंकार बरा नव्हे! जे निवडून आले, त्यांना विचारा कसे निवडून आले ते? असा प्रतिहल्ला चढविला. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही पक्षांत शाब्दिक हल्ले आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये महापालिका निवडणूक एकत्र लढायची की स्वबळावर? यावरून जोरदार शाब्दिक हल्ले सुरू झाले आहेत. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वबळाची भाषा करताना स्थानिक पातळीवर युती तोडण्याबाबत विधाने केली होती. यामुळे तिळपापड झालेल्या शिवसेनेने 'घमेंड करू नका, युती तोडली तर पश्चाताप होईल'असे प्रत्युत्तर दिले होते. यामुळे आगीत आणखीच तेल ओतले गेले.
माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी 'भाजपची देशात 20 राज्यांमध्ये सत्ता आहे, कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवायला बोलतच असतात. युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील' असे म्हणत तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला. तर आमदार संजय केणेकर यांनी कडक भाषेत '1988 ची शिवसेना आता कुठे राहिली आहे? विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाया रचला म्हणून शिवसेनेला कळस दिसू शकला असा हल्ला चढविला.
या सर्व पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी स्थानिक भाजप नेते अत्यंत जोशात आहेत. आम्ही काय बोलावे, काय बोलू नये, आमचे आम्ही बघू. आम्ही त्यांच्यामुळे उठाव केला आणि सत्तेत आलो आणि ते कुणामुळे आले? एकमेकांच्या सहकार्याशिवाय जिंकणे शक्य नव्हते. त्यामुळे कुण्या एकाने श्रेय वादात जाऊ नये. स्थानिक पातळीवर युती व्हावी, असे शिवसेनेचे धोरण आहे. पण, ज्यांना वाटते युती होऊ नये, त्यांनी पक्षाच्या प्रमुखांना कळवावे. मात्र, जाहीर वाच्यता करू नये. त्याचा परिणाम मतदारांवर होतो, असे म्हणत भाजप नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.