नवनाथ इधाटे
फुलंब्री : विधानसभेच्या फुलंब्री मतदारसंघातून (BJP) भाजपच्या अनुराधा चव्हाण मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष फुलंब्रीचे माजी आमदार हरिभाऊ बागडे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघात निवडणुक काळात बंद पडलेल्या देवगिरी साखर कारखान्याचा मुद्दा प्रचंड गाजला होता. भाजपच्या उमेदवार अनुराधा चव्हाण आणि काँग्रसे महाविकास आघाडीचे विलास औताडे या दोघांनी देवगिरी कारखान्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते.
तर काँग्रसेचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांनी भाजपला देवगिरी कारखाना सुरू करणार असे शपथपत्र लिहून द्यावे, किंवा आम्ही ते लिहून देतो, असे खुले आव्हान दिले होते. काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनीही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही देवगिरी कारखाना सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळवू घेऊ, असा दावा केला होता. एकूणच फुलंब्री मतदारसंघाची निवडणूक पंचवीस वर्ष बंद असलेल्या देवगिरी कारखान्या भोवतीच फिरली होती.
मतदारांनी भाजपच्या अनुराधा चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडून दिले. आमदार झाल्यानंतर नागपूरच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत देवगिरी कारखाना सुरू होणे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचे आहे हे पटवून देत तो सुरू करण्यासाठी निवदेन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नवनिर्वाचित आमदारांची तळमळ पाहत 'आपण हे नश्चितच करू' असे आश्वासन अनुराधा चव्हाण यांना दिले.
फुलंब्री मतदार संघातील शेतकरी, कामगार, व्यावसायिक यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणू शकणारा देवगिरी सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. आपण हा कारखाना सुरू करणार असा शब्दही निवडणुक प्रचारात जनतेला दिला होता. याच अनुषंगाने काल 20 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
हा कारखाना शेतकरी बांधवांच्या मेहनतीतून उभा राहिला होता. हा कारखाना सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याने 'यामध्ये मी स्वतः लक्ष घालतो, काळजी करू नये', असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचे अनुराधा चव्हाण यांनी सांगितले. या भेटीच्यावेळी त्यांच्यासोबत भाजपा तालुकाध्यक्ष सांडूअण्णा जाधव, सर्जेराव मेटे, दत्ताभाऊ उकिर्डे, राजू तुपे, योगेश मिसाळ, सुचित बोरसे हे देखील होते. पंचवीस वर्षापासून बंद असलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले असून त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा आनंद असल्याचे अनुराधा चव्हाण म्हणतात.
पाचशे कोटींची रस्त्याची कामे रखडली..
दरम्यान, याशिवाय फुलंब्री विधानसभा मतदारसंघात तात्कालीन आमदार हरिभाऊ बागडे यांच्या आमदार निधीतून 500 कोटीच्या रस्त्याची दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली होती. त्याचे कार्यारंभ आदेश देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले होते. मात्र पाच महिन्याचा कालावधी उलटूनही संबंधित गुत्तेदारांनी कामे सुरू न केल्याने त्यांच्याकडून कामे काढून घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अनुराधा चव्हाण यांनी सभागृहात केली. निविदा करारनामाच्या तरतुदीनुसार 30 दिवसांमध्ये काम सुरू न केल्यास अशा गुत्तेदाराकडून संबंधित कामे काढून घ्यावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असेही त्या म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.