Marathwada Political News : मतदारसंघातील प्रश्न सभागृहात मांडणे, ते सोडवणे आणि सर्वसामान्य लोकांचे जीवनमान सुधारणे हा मुख्य उद्देश घेऊन आम्ही लोक प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. प्रश्न मतदारसंघातला असो, की गावातला तो राज्य पातळीवर नेऊन कसा सुटेल असाच आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, रोजगार आणि मतदारसंघातील शाश्वत विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असताना सगळेच साध्य होईल असे नाही. पण ज्या विश्वासाने मतदारांनी आम्हाला निवडून पाठवले त्यांचा तो विश्वास चांगल्या कामातून सार्थ ठरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधत वेगळी ओळख निर्माण करू, असा विश्वास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदारांनी व्यक्त केला.
सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित 'माझा मतदारसंघ, माझी भूमिका' या उपक्रमात जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार प्रशांत बंब, विलास भुमरे, अनुराधा चव्हाण, संजय केणेकर, प्रा.रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी आपापल्या मतदारसंघाबद्दलचे व्हिजन या निमित्ताने मांडले. दुष्काळ, उद्योगांची स्थिती, सांस्कृतिक वारसा जपत विकास, शिक्षण व्यवस्था, शहराच्या पाण्याचा प्रश्न अशा विविध विषयांना हात घातला. मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक, त्यासाठी केलेला पाठपुरावा, मिळालेले यश आणि भविष्यात काय करायचे आहे? या संदर्भात सगळेच आमदार भरभरून बोलले.
शिक्षण व्यवस्था सुधारायला हवी-प्रशांत बंब
भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षण व्यवस्थेवर देश पातळीवर काम होणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षण व्यवस्था सुधारली आणि मुलांना चांगले शिक्षक मिळाले तरच हा हेतू साध्य होईल. (Chhatrapati Sambhajinagar) पण आज 80 टक्के शिक्षक हे केवळ पगार घेतात, त्या तुलनेत मुलांना चांगले शिक्षण ते देतात का? मुळात त्यांना काही येते का? असा सवाल उपस्थित केला. राज्याच्या बजेटमधला मोठा हिस्सा शिक्षण, शिक्षकांच्या पगारावर खर्च होतो, पण त्यातून चांगले विद्यार्थी खरचं घडतात का? याबद्दल बंब यांनी शंका उपस्थित करत यावर आपण काम करणार असल्याचे सांगितले.
समन्यायी पाणी वाटपावर आग्रही भूमिका घेतल्यामुळे मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळाल्याचे बंब म्हणाले. बंद पाईपलाईनमधूनची पाणी योजना, मतदारसंघातील आरापूर एमआयडीसी, तसेच संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी मी हाती घेतल्यास तीन दिवसाला पाणी देतो, असे सांगत त्यांनी योजनेतील त्रुटींवर आक्रमक भाष्य केले. मतदारसंघातील करोडी येथे लवकर स्पोर्ट यूनीव्हर्सिटीचे काम सुरू होणार असल्याचे बंब यांनी सांगीतले.
मतदारसंघातील रस्त्याचे चित्र बदलले - प्रा. रमेश बोरनारे
मतदारसंघातील रस्त्याची दुरावस्था झाली होती. आमदार झाल्यानंतर आपण रस्त्याचे डांबरीकरण केले, 218 पैकी केवळ बोटावर मोजण्या इतकीच गावे आता शिल्लक राहिली असल्याचे वैजापूरचे शिवसेना आमदार प्रा.रमेश बोरनारे यांनी सांगितले. मतदारसंघातील रोटेगाव-वैजापूर एमआयडीसीचा प्रश्न, बंद पडलेली आणि आता कर्जमुक्त झालेली रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरू करणे, 1075 कोटीच्या माध्यमातून सत्तर टक्के पूर्ण झालेल्या वाॅटरग्रीडमधून पावणे चारशे गावांचा सुटणारा प्रश्न, नारंगी-सारंगी प्रकल्पात पारखेड धरणाचे पन्नास टक्के पाणी आणण्याची योजना यातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा आपला प्रयत्न असल्याचे बोरणारे म्हणाले.
सांस्कृतिक वारसा जपत विकास-संजय केनेकर
विधान परिषदेवर मिळालेल्या संधीचा उपयोग मराठवाड्यातील दुष्काळ आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी करून घेणार असल्याचे भाजपाचे विधान परिषदेतील आमदार संजय केणेकर यांनी सांगितले. मराठवाड्याला राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाली. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेते मराठवाड्याने दिले. पण आपण अपेक्षित विकास साधू शकलो नाही. मराठवाड्याला एक वर्ष उशीराने स्वातंत्र्य मिळाले, गेल्या पन्नास वर्षात या भागाला काय मिळाले? शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, रस्ते विकास आणि सिंचन क्षेत्रात आपण किती मजल मारू शकलो? पाण्याची उपलब्धता आहे, पण ती वाहून आणणारी व्यवस्था आपण निर्माण करू शकलो, नाही अशी खंत व्यक्त करत भविष्यात हेच प्रश्न घेऊन पुढे जाणार असल्याचे केनेकर म्हणाले.
मोफत शिक्षण, महिला सुरक्षेला प्राधान्य- अनुराधा चव्हाण
आदर्श गावपासून सुरू झालेला समाजसेवेचा प्रवास लोकांच्या आशिर्वादाने विधानसभेत पोहचण्या पर्यंत झाला. यातून काम करण्यासाठी मोठी ताकद मिळाल्याची भावना फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी व्यक्त केल्या. महिलांची सुरक्षितता, ग्रामीण भागातील मुला-मुलांना चांगले, गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत मिळाले पाहिजे, यासाठी प्रामुख्याने आपण काम करणार असल्याचे चव्हाण म्हणाल्या. विविधतेने नटलेल्या मतदारसंघातील १६ गावांचा प्राधिकरणातील समावेश, आदर्श गावासाठी राबवलेली पंचसुत्री आता मतदारसंघात राबवण्याचा आपला मनोदय आहे. अंगणवाडीपासूनच ग्रामीण भागातील मुलांना बौद्धिक शिक्षणाचा आग्रह, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण याची गरज ओळखून त्यासाठी आपले प्रयत्न राहतील. मतदारसंघातील शेतकर्यांसाठी बंद पडलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केल्याचे अनुराधा चव्हाण यांनी सांगीतले.
संतांची भूमी पैठणला वेगळी ओळख मिळवून देणार- विलास भुमरे
पैठण ही संतांची भूमी आहे, पैठण-आपेगाव प्राधिकरणाच्या माध्यमातून इथे सांस्कृतिक विकास आणि परिवर्तन घडवायचे आहे. संत पीठ, संत ज्ञानेश्वर उद्यान, जायकवाडी धरणामुळे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष असलेला हा माझा मतदारसंघ व त्याचा चेहरामोहरा येत्या दोन तीन वर्षात बदलणार आहे. संदीपान भुमरे यांनी प्रदीर्घ काळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचे अपूर्ण राहिलेले काम आता आमदार म्हणून मला पूर्ण करायचे आहे. पैठणीचे क्लस्टर, संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास, ब्रम्हगव्हाण सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी मुबलक पाणी, शहरासाठी पाणी पुरवठा योजना पूर्ण करून नागरिकांना दररोज पाणी ही कामे येत्या दीड-दोन वर्षात पूर्ण करण्याचे आपले उदिष्ट असल्याचे विलास भुमरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.