

Beed Politics : पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान खासदार बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे यांच्यात खडाजंगी झाल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या. याशिवाय, मुंडे यांनी शेतकऱ्यांना दम दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. या प्रकारावर धनंजय मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत माध्यमांना, सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे का? असा सवाल केला.
बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडे गेल्या दोन वर्षांपासून विविध संकटांचा सामना करत आहेत. मीडिया ट्रायलवरही त्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिल्हा दौऱ्यात धनंजय मुंडे सातत्याने त्यांच्यासोबत होते. या दौऱ्याच्या नियोजनातही त्यांचा महत्त्वाचा रोल होता.
दरम्यान, पालकमंत्र्यांचा दौरा, विविध विकासकामांची उद्घाटने, लोकार्पण आणि आढावा बैठक, डीपीडीसी याचे वृत्तांकन आणि त्या अनुषंगाने आलेल्या काही बातम्यांबद्दल मुंडे यांनी नाराजी व्यक्त करत माध्यमांना सल्लेही दिले. खासदार बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे यांच्या डीपीडीसीच्या बैठकीत खडाजंगी आणि शेतकऱ्यांना दम दिल्याचा आरोप, हे वृत्त त्यांनी फेटाळले.
बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण संवेदनशील असतानाच, गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियासह काही ठराविक माध्यमांवर खोट्या बातम्या प्रसारित केल्या गेल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. कोणतीही बातमी चालवण्यापूर्वी तिची सत्यता पडताळण्याची तसदी तरी घ्या, असा सल्ला देत, काही माध्यम प्रतिनिधी ठराविक अजेंडा राबवून जिल्ह्यातील शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोपच त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून केला आहे.
गेल्या दोन दिवसांत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या दोन प्रमुख वादांवर धनंजय मुंडेंनी थेट उत्तर देत वस्तुस्थिती मांडली. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींसोबत खडाजंगी झाल्याच्या बातम्या धादांत खोट्या आहेत. ती बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक संवाद आणि सौहार्द कायम असतो.
बैठकीतील प्रत्यक्षदर्शींकडून याची खात्री न करताच चुकीच्या बातम्या पसरवण्यात आल्या. आणि दिवंगत अजितदादांच्या माघारी बीड शहरात प्रथमच आलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार या आधीच कौटुंबिक दुःखात असताना, गर्दीच्या ठिकाणी काही नागरिक मोठ्या आवाजात बोलत असल्याने प्रश्न शांतपणे मांडून हळू बोला, एवढीच विनंती मी केली होती. परंतु, याचे रूपांतर धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांना दम दिला, असे करण्यात आले.
अशा प्रकारे विपर्यास करून बातम्या चालवण्याचा विकृत प्रयत्न केला जात असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील पत्रकारांबाबतही त्यांनी गंभीर आरोप केले. बीड जिल्ह्यातील 90 टक्क्यांहून अधिक पत्रकार हे अत्यंत जबाबदारीने, निर्भीडपणे आणि निष्पक्ष काम करतात. त्यांच्या पत्रकारितेचा मी नेहमीच आदर करतो.
मात्र, उरलेल्या काही पत्रकारांच्या बाबतीत आर्थिक गैरव्यवहारांसह अनेक गंभीर तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. कुणाचे तारुण्यात नुकसान होऊ नये म्हणून मी वरिष्ठांकडे दाद मागितली नाही, असे सांगत धनंजय मुंडे यांनी एक प्रकारे माध्यम प्रतिनिधींना थेट इशाराच दिला. जिल्ह्यात बिघडलेला सामाजिक सौहार्द आता कुठे हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशा काळात चुकीच्या बातम्या पेरून वातावरण बिघडवू नका, असे आवाहनही मुंडे यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.