

Maratha reservation: जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे सुरू होणाऱ्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पूर्वी 28 तारखेला सरकारने अंतरवाली सराटीत येऊन मराठा आरक्षणावर चर्चा करावी, असे आवाहन केले होते.
या संदर्भात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजवंदनासाठी जालना येथे आलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना माध्यमांनी बोलते केले. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अंतरवाली सराटीमध्ये येऊन चर्चा करण्याचे दिलेले निमंत्रण यावर सरकार सकारात्मक भूमिका घेईल, अशा एका शब्दातच त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा विषय संपवला.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यापूर्वी म्हणजे 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य करून पूर्ण कराव्यात, अन्यथा अंतरवाली सराटीत येऊन चर्चा करावी, असं आवाहन जरांगे यांनी केलंय. त्यांच्या या आवाहनाला सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने नोंदी आणि वंशावळीनुसार मराठा समाजाला मराठा कुणबी जातीची प्रमाणपत्र वाटप केली आहेत. या प्रमाणपत्रांवर नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. मात्र विरोधकांकडून निवडून आलेल्या अशा मराठवाड्यातील काही जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिकेतील नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्रांना आव्हान दिले गेले.
जात पडताळणी समितीनेही ही प्रमाणपत्रे रद्द केली. त्यामुळे या सदस्य आणि नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान मराठा कुणबी जातीचे सरकारनेच दिलेले प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून रद्द कसे होते असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ हे त्यांच्या निशाण्यावर आहेत. बावनकुळे यांच्या एका पत्राचा दाखला देत जरांगे पाटील यांनी त्यांच्या विरोधात रान उठवले आहे. अशावेळी पंकजा मुंडे यांनी अधिक सावध भूमिका घेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अगदी मोजक्या शब्दात उत्तर देत आपल्याबद्दल कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही याची काळजी घेतल्याचे दिसून आले.
मराठा आरक्षणाच्या विषयावर सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे यांनी सावध भूमिका घेतलेली आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवतानाच ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता ते दिले जावे, अशी भूमिका पंकजा यांनी वेळोवेळी घेतली आहे. राजकारणातून निवृत्त व्हावे असे वाटते या त्यांच्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत पंकजा मुंडे यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे चालवला आहे, एका गरीब वंजारी समाजाला त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे त्यामुळे त्यांनी कदापिही राजकारणातून निवृत्त होऊ नये, असे म्हटले होते. पंकजा मुंडे यांच्या बद्दल मनोज जरांगे पाटील यांची बदललेली ही भूमिका पाहता पंकजा यांनीही त्यांच्या आंदोलनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर सावधपणे उत्तर देत वेळ मारून नेली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.