

Chhatrapati Sambhaji Nagar: महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली. पाणीपुरवठा योजनेचे श्रेय आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठरावाला भाजपाचा विरोध, छत्रपती संभाजीनगर नामकरण केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करणाऱ्या ठरावाच्या विरोधात एमआयएमचा बायकॉट आणि एका एजन्सीला तब्बल 22 कोटी अतिरक्त दिल्याचा प्रकरणावरून एमआयएमने दिलेल्या '22 खोके, एकदम ओके'च्या घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला.
कंत्राटी कर्मचारी पुरवठा करणाऱ्या महाराणा एजन्सीला प्रशासन व सत्ताधारी भाजप पक्ष पाठीशी घालत असल्याचा आरोप करत एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात सताधाऱ्यांना धारेवर धरले. तर अतिक्रमणाला पाठीशी घालणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई झालीच पाहिजे, असा पलटवार भाजप नगरसेवकांनी एमआयएमवर केला. या गोंधळात सभेचे कामकाज संपविण्यात आले. दरम्यान, ‘छत्रपती संभाजीनगर’ नामकरणावरून एमआयआय नगरसेवकांनी सभेवर काही काळ बहिष्कार टाकला. पाणी योजनेसंदर्भातील अभिनंदन ठरावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेतल्याने जाब विचारणाऱ्या ठाकरे सेनेच्या सहा नगरसेवकांना महापौर समीर राजूरकर यांनी बाहेरचा रस्ता दाखविला. त्यामुळं सहा तास चाललेल्या सभेत हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
सभागृहात एमआयएम पक्षाचे 33 नगरसेवक असल्याने गटनेत्याला पुढच्या रांगेत जागा मिळावी, अशी मागणी विरोधीपक्षनेता समीर साजेद बिल्डर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्या अफसर खान, अमित भुईगळ यांनी सभागृहातील समोरची जागा आधीच बळकावल्याने विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजेद बिल्डर नाराज झाले. महापौरांनी सभागृहात कोणी कुठे बसावे, याची नियमावली नाही. आगामी काळात तशी नियमावली तयार करण्यात येईल, असे सांगून पहिल्या रांगेत बसा, अशी सूचना त्यांना केली.
हा वाद मिटल्यानंतर नगरसेवक प्रमोद राठोड यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा सिडकोतील पुतळा स्थलांतरित करून आयुक्त जी. श्रीकांत यांनी वाहतुकीची कोंडी फोडली, त्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यावर राज वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरासाठी एकाच उड्डाणपुलाची घोषणा करून त्यासाठी निधीची तरतूद केल्यामुळे त्यांचे देखील अभिनंदन करण्यात यावे, अशी मागणी केली.
दरम्यान, राजू वैद्य यांनी पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास येत असून, या योजनेबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी केली. त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर महापौरांनी ठराव मंजूर केली. यावेळी ठाकरे सेनेचे गणेश लोखंडे, रशीद मामू, सचिन खैरे यांच्यासह इतरांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाणी योजनेच्या कामाचा नारळ फोडल्यामुळे त्यांच्या नाव देखील अभिनंदनाच्या ठरावात घेण्याची मागणी करत महापौरांच्या डायससमोर गोंधळ घातला.
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या एजन्सीची भाजपकडून पाठराखण
शिवसेनेचे शहराध्यक्ष असलेल्या विश्वनाथ राजपूत यांच्या महाराणा एजन्सीमार्फत अनेक वर्षांपासून महापालिकेला कंत्राटी कर्मचारी पुरवठा केले जात होते. या एजन्सीला जास्तीचे तब्बल 22 कोटी रुपये अदा करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने काम थांबवून नव्याने निविदा प्रक्रिया राबविली, असे असले तरी अद्याप 22 कोटी रुपये वसूल करण्यात आलेले नाहीत.
यासंदर्भात नगरसेवक फेरोज खान यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर महापौरांनी प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात सर्व माहिती आहे. त्यामुळे उपप्रश्न विचारा, अशी सूचना केली. त्यावरून बराचवेळ चर्चा झाल्यानंतर प्रमोद राठोड यांनी शहागंज येथील अतिक्रमणाचा विषय उपस्थित केला. काही नगरसेवकांनी प्रशासनाच्या या कारवाईला विरोध करत हिरोगिरी केल्याचा आरोप राठोड यांनी करताच एमआयएमचे नगरसेवक भडकले.
भाजप व एमआयएम नगरसेवकांमध्ये खडाजंगी सुरू होताच महापौरांनी सभेचे कामकाज आटोपते घेतले. त्यानंतर सभागृहात एमआयएमने '22 खोके एकदम ओके' अशा जोरदार घोषणा दिल्या. तर भाजप नगरसेवकांनी अतिक्रमणे हटविण्यास विरोध करणाऱ्यांचे निलंबन झालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. घोषणा देतच दोन्ही पक्षाचे नगरसेवक सभागृहाबाहेर पडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.