छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत गंभीर दुफळी निर्माण झाली असून जिल्हाप्रमुख भाजपकडे झुकत असल्याची चर्चा.
संजय शिरसाट यांचा स्थानिक संघटनांवरील कंट्रोल कमी होत चालल्याने पक्षात नाराजी वाढली आहे.
भाजपचे काही नेते सक्रिय झाल्याने शिवसेनेतील गळती आणखी वाढू शकते, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जातो.
Chhatrapati Sambhajinagar News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा लागली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सोळा माजी नगरसेवक आठ माजी महापौरांनी आतापर्यंत पक्षात प्रवेश केला. ही गळती पाहता उद्धव ठाकरेंची सेना आता शिल्लक राहते की नाही? अशी खिल्ली देखील उडवली गेली. परंतु आता ही फोडाफोडीच शिवसेनेच्या मुळावर येऊ लागली आहे.
मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाल्यामुळे पक्षात पदांसाठी स्पर्धा सुरू झाली. अनेकांच्या अधिकारांवर गदा येऊ लागली. याचा परिणाम नाराज आणि त्यातून थेट पक्षाला जय महाराष्ट्र करण्यात होऊ लागला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नेतृत्व सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे आहे. सगळ्यांना सोबत घेऊन पक्ष, संघटना वाढवणे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यशाचा झेंडा रोवणे यांची प्रमुख जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
परंतु गेली काही महिने स्वतः संजय शिरसाट हेच विविध भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हैराण होते. हे वातावरण काहीसे शमत नाही तोच पक्षांतर्गत दुफळी उफाळून आली आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रचार जोमात असताना शिवसेनेला एकापाठोपाठ धक्के बसू लागले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आऊटगोईंग थांबल्यानंतर आता भाजपने थेट सत्तेत सोबत असलेल्या मित्रपक्षावरच घाला घालायला सुरूवात केली आहे. अर्थात याला शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी देखील तितकीच कारणीभूत आहे. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे गेल्या काही महिन्यापासून पक्षात साईड ट्रॅक झाले आहेत.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ही परिस्थिती त्यांच्यावर आणल्याची चर्चा आहे. खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांचे पक्षात महत्व वाढले आहे. शिरसाट यांनी आमदार प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार यांच्याऐवजी भुमरेंना झुकते माप दिले आहे. पक्ष संघटनेत विलास भुमरे यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्यापासून शिवसेनेत वादाची थिणगी पडल्याचे बोलले जाते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीच्या तयारीसाठी तयार करण्यात आलेल्या निर्णय प्रक्रियेच्या यंत्रणेतून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनाच खड्यासारखे दूर करण्यात आल्याचे चित्र आहे.
आमदार प्रदीप जैस्वाल आणि जंजाळ यांच्यातील संबंधही कमालीचे बिघडले होते. या सगळ्यांचा परिणाम म्हणून जंजाळ यांना बाजूला ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेतील या सगळ्या घडामोडींवर भाजपच्या स्थानिक नेत्यांचे बारकाईने लक्ष आहे. यातूनच माजी नगरसेविका तथा शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शिल्पाराणी वाडकर व त्यांचा समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. हे कमी की काय म्हणून काल फुलंब्रीत चक्क नगराध्यक्षपदाच्या उमेदवारानेच शिवसेनेच्या बैठकीतून 'माझा दात दुखत आहे' असे सांगत धूम ठोकली आणि थेट भाजपच्या तंबूत उडी घेतली.
भाजप संधीच्या शोधात..
राज्यभरात फोडाफोडीला जोर आलेला असताना त्याचा सर्वाधिक फटका हा शिंदेंच्या शिवसेनेला बसताना दिसतो आहे. महिला जिल्हाप्रमुख, फुलंब्रीतील नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपच्या गळाला लागल्यानंतर आता जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे ही भाजपच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. एका स्थानिक वृत्तपत्रात राजेंद्र जंजाळ यांनी आपल्या पक्ष संघटनेतील जबाबदारी पासून दूर ठेवले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले असल्याचे म्हटले आहे. त्यांचा रोख हा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे होता.
तर दुसरीकडे संजय शिरसाट यांनी उलट जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी स्वतःहून जिल्ह्याचे दौरे केले पाहिजेत, त्यांच्यावर जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी असल्याचे त्यांच्याच कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला आहे. भाजपने पैसा आणि दबावाच्या जोरावर फुलंब्रीतील आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फोडल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला आहे. एकूणच शिवसेनेतील दुफळी, पक्षात आलेल्यांची संख्या आणि मर्यादित पद, जबाबदाऱ्या पाहता उडणारे खटके धोकादायक ठरू लागले आहे. पक्षांतर्ग गटबाजी रोखण्यात पालकमंत्री संजय शिरसाट अपयशी ठरले आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. भाजप मात्र मित्र पक्षाच्या या होणाऱ्या वाताहतीकडे संधी म्हणून पाहत आहे.
1. शिवसेनेत नेमकी दुफळी का निर्माण झाली आहे?
स्थानिक पातळीवरील नाराजी, गटबाजी आणि नेतृत्वावरील अविश्वासामुळे ही परिस्थिती तयार झाल्याचे सांगितले जाते.
2. जिल्हाप्रमुख नेमके भाजपकडे जाणार आहेत का?
अधिकृत घोषणा नसली तरी त्यांची हालचाल आणि भाजप नेत्यांशी संपर्क वाढल्याने अटकळींना उधाण आले आहे.
3. संजय शिरसाट कोणत्या कारणाने अडचणीत आले?
त्यांच्या निर्णयशैलीबाबत असंतोष आणि स्थानिक नेत्यांशी वाढत्या दुराव्यामुळे त्यांचे नियंत्रण कमी झाल्याचे बोलले जाते.
4. या घडामोडींचा निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
शिवसेनेच्या मतांवर थेट परिणाम होऊन भाजपला फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होते.
5. पक्षफुट थांबवण्यासाठी शिवसेना नेतृत्व प्रयत्न करत आहे का?
होय, स्थानिक पातळीवर काही समन्वय बैठका व चर्चाही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.