Chhatrapati Sambhajinagar News, 20 Oct : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एका उपोषणकर्त्याला घरी बोलावून उपोषण सोडायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शेतकऱ्यांसाठी उपोषण करणाऱ्या व्यक्तीला उपषोनस्थळी भेट देण्यास वेळ नसल्याने त्यालाच घरी बोलावून घरात उपोषण सोडायला लावल्याचं उघडकीस येताच शिरसाट यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे.
त्यामुळे पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्यांबाबत संवेदनशीलता आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय कोणतंही आंदोलन असेल तर त्यावेळी राजकीय नेते किंवा प्रशासकीय अधिकारी आंदोलनस्थळी जातात. मात्र, आंदोलनकर्त्यालाच घरी बोलावल्याचं अनोखा उद्योग संजय शिरसाट यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत शासनाकडून ठोस मदत मिळावी, तसेच तत्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर 10 ऑक्टोबरपासून संदीप विजयकुमार सेठी यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकारप्रमाणे सरसकट नुकसानभरपाई द्यावी, पूरग्रस्त मृतांच्या कुटुंबियांना तातडीची मदत करावी, सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी जाहीर करून नवीन कर्ज मंजूर करावे, बँक वसूली वर्षभरासाठी स्थगित करावी इत्यादी मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या.
दरम्यान, तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते संदीप सेठींना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतू त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट उपोषणस्थळी येऊन आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार केला होता.
त्यांच्या या निर्णयामुळे प्रशासनाची कोंडी झाली. त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीवर असतील, त्यामुळे उपोषण मागे घ्या, असा आग्रह काही अधिकाऱ्यांनी केल्यानंतर तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि शिवसेनेचे उपसंघटक शिवाजी थेटेंनी पालकमंत्री शिरसाटांसोबत संपर्क साधला.
मात्र, यावेळी पालकमंत्र्यांनी बिझी शेड्युल असल्यामुळे कन्नडला येणे शक्य नसल्याचं सांगितलं. एवढंच नव्हे तर त्यांनी थेट उपोषणकर्त्यांनाच पालकमंत्र्यांच्या घरी आणा, इथे उपोषण सोडवू, असा निरोप दिला. त्यामुळे अखेर उपोषणकर्त्याला उपोषणाच्या नवव्या दिवशी थेट छत्रपती संभाजीनगर शहरातील संजय शिरसाट यांच्या घरी आणलं.
त्यानंतर शिरसाट यांनी उपोषणकर्त्याला ज्युस पाजून उपोषण सोडलं. मात्र, पालकमंत्री म्हणून शिरसाट यांनी स्वत: उपोषण स्थळी जायला पाहिजे होतं, त्यांनी केलेली कृती अयोग्य असल्याची टीका अनेकांकडून केली जात आहे. शिवाय या कृतीमुळे पालकमंत्र्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याचं लोक म्हणत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.