Beed politics : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे. दिवंगत नेते अजित पवार यांनी सुरुवातीपासून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले होते. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे तीन आमदार जिल्ह्यात निवडून आले. अजित पवार यांच्या बारामती आणि पिंपरी चिंचवड पॅटर्नवर विश्वास ठेवत नगरपालिकेची सत्ताही पक्षाला मिळाली. मात्र अजित पवारांच्या दुर्दैवी निधनाने जिल्ह्यातील पक्षाची घडी पूर्णपणे विस्कटल्याचे चित्र आहे.
पक्ष, संघटना वाढवण्याची जबाबदारी असणारे पक्षाचे तीन आमदार धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके यांच्यातच वाद आणि मतभेद असल्यामुळे त्याची लागण नगरपालिकेच्या सत्तेतील नगरसेवकांनाही झाली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली असून 11 नगरसेवक बंडाच्या तयारीत आहेत.
कोणत्याही क्षणी पक्षाला भगदाड पडू शकते अशी परिस्थिती असताना हे तीनही आमदार एवढे निर्धास्त कसे? असा प्रश्न त्यांच्याकडे बघून निश्चितच पडतो. मराठा आरक्षणाचे आंदोलन जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष टोकाला गेला आहे.
त्यातच मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष करत त्यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. तर दुसरीकडे आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांनी मात्र मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या मागणीला वेळोवेळी पाठिंबा दर्शवला.
या पक्षातील दोन्ही आमदारांची मनोज जरांगे पाटील यांच्याशी वाढलेली जवळीक धनंजय मुंडे यांना कुठेतरी खटकत होती. मराठा आरक्षण मागणीसाठी अंतरवाली सराटी असो की मग मुंबईचे आझाद मैदान या प्रत्येक ठिकाणी विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके हजर होते. धनंजय मुंडे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी आपल्याच पक्षातील आमदारांची असलेली ही जवळीक मुंडे यांना कायम खटकली.
यातूनच त्यांच्यामध्ये कटुता आणि दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जाते. माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांनी कायमच धनंजय मुंडे यांचा विरोध केला आहे. विधानसभेच्या सभागृहात त प्रश्न विचारणाऱ्या मुंडे यांच्यावर अनेकदा त्यांनी टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.
याशिवाय विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाडण्यासाठी मुंडे बहीण भावांनीच पैसे देऊन उमेदवार उभे केले होते असा जाहीर आरोप सोळंके यांनी केलेला आहे. त्यामुळे एकाच पक्षात असले तरी या दोघांमध्ये सख्य नाही.
सोळुंके यांच्याप्रमाणेच गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचा बीड विधानसभा मतदारसंघातील वाढता हस्तक्षेप आणि जिल्ह्याचा नेता होण्याचे प्रयत्न यातून या दोघांमध्येही राजकीय स्पर्धा सुरू आहे. दिवंगत नेते अजित पवार यांनी आतापर्यंत या तीनही आमदारांवर अंकुश ठेवला होता. मात्र, त्याही काळात हे आमदार क्वचितच सोबत यायचे. अजित पवारांचा बीड दौरा असेल तेव्हा हे तिन्ही आमदार त्यांच्या व्यासपीठावर दिसायचे. त्यांची पाठ फिरली की हे तीनही आमदार एकमेकांना पाठ दाखवायचे. हाच कित्ता पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यातही गिरवला जात आहे.
सुनेत्रा पवार यांचा आजचा तिसरा बीड दौरा होता. या दौऱ्यातही धनंजय मुंडे विजयसिंह पंडित हे एकत्र दिसले. व्यासपीठावर त्यांच्यात काही संवादही झाला. मात्र हे चित्र क्षणिक ठरते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री सुनेत्र पवार यांनी अद्याप या तीनही आमदारांची एकत्रित बैठक किंवा पक्ष संघटनेचा आढावा घेतलेला नाही.
आतापर्यंत सुनेत्रा पवार यांचे झालेले तीनही जिल्हा दौरे हे एक मे महाराष्ट्र दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जिल्हा नियोजन समितीसाठी झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसाठी स्वतंत्र दौरा त्या कधी करणार यावरच पक्षाचे डॅमेज कंट्रोल अवलंबून असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.