Marathwada News : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या सातत्याने शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करत असतात. तसेच शिंदे गटाकडूनही अंधारे यांच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत असते. मात्र,शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती. यानंतर अंधारे यांनी संताप व्यक्त केली आहे. संजय शिरसाट यांनी स्वतःची वैचारिक लायकी दाखवून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन अशी टीका अंधारे यांनी यावेळी केली आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे. अंधारे म्हणाल्या, संजय शिरसाटां(Sanjay Shirsat)नी माझ्याबद्दल काहीतरी सवंग सुमार शाब्दिक टिप्पणी केल्याचे माध्यमांकडून समजले. इतरांच्या लेकीबाळीकडे आई किंवा बहिणीच्या नात्याने बघण्यासाठी अंगी शील पारमिता असावी लागते.
सत्ता आणि संपत्तीची धुंदी आलेल्या शिरसाट यांच्या सारख्या लोकांकडे अशी शील पारमिता असण्याची सुतराम शक्यता नाही. अन् ज्याच्या ठायी शील पारमिता नाही, ती व्यक्ती बाबासाहेबांचा अनुयायी तरी असू शकते का? असा प्रश्न उरतोच असंही अंधारे यावेळी म्हणाल्या.
तसेच शिरसाट यांच्या बोलण्यातून महाराष्ट्रातील लेकीबाळींकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती गलिच्छ आणि विकृतीने बरबटलेली आहे याचाच त्यांनी पुरावा दिला आहे. म्हणूनच मला शिरसाट यांच्या बोलण्याचा राग आला नाही. उलट स्वतःची वैचारिक लायकी दाखवून दिल्या बद्दल त्यांचे अभिनंदन. याचवेळी त्यांनी पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा..!!असा टोलाही अंधारे यांनी शिरसाटांना लगावला आहे.
काय आहे प्रकरण ?
आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना वैचारिक पातळी सोडली होती. शिरसाट म्हणाले, ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ आहेत. पण काय काय लफडे केले तिने काय माहीत असं विधान त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. याचवेळी त्यांनी अंबादास दानवे यांच्याविषयी मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. अंबादास दानवेनी मला फोन केला होता. म्हणाले, ती बाई डोक्याच्यावर झाली आहे.
...याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा!
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या सभेवरही टीका केली. मालेगावची सभा उद्धव ठाकरे यांच्या नावावर असली तरी ती सभा हिंदुत्वाची वाटत नव्हती. ठाकरे यांच्या बाजूला जे लोक आहेत ते त्यांचे कधीच नव्हते. उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या लोकांनी 40-45 वर्षे शिवसेनेत काम केलंय. ठाकरे यांच्याकडून काही चूक झाली असेल म्हणून बाळासाहेबांचे खंदे समर्थक सोडून गेले. याचा विचार उद्धव ठाकरे यांनी करावा असंही शिरसाट म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.