
Chhatrapati Sambhajinagar : विधानसभा निवडणुकीला आणखी पावणे पाच वर्षे बाकी आहेत. आता 2025 सुरू आहे 2029 पर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शून्य झालेला असेल, अशी टीका सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली. एवढेच कशाला महानगरपालिका निवडणुका होऊ द्या, त्यानंतर तुम्हाला 'उबाठा'पक्ष शोधूनही सापडणार नाही, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या शिंदेंची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena UBT) संघर्ष चिघळला आहे. विशेषत: शहरातील पाणी पुरवठ्यावरून हे दोन पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. तरीही संभाजीनगरकरांना दररोज प्यायला पाणी मिळत नाही. याचे खापर आता अडीच वर्षे राज्यात सत्ता असलेल्या महाविकास आघाडी आणि त्या सरकारचे मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर फोडले जात आहे.
या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पाणी प्रश्नावर शहरात मोर्चा काढणार आहे. (Sanjay Shirsat) या मोर्चाला शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे उपस्थित असणार आहेत. याशिवाय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणण्याची देखील प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे. दरम्यान पाणी प्रश्नावर शहरात तब्बल महिनाभर आंदोलन करण्यात येणार असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पाणी प्रश्नावरून सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे.
या सगळ्या घडामोडी सुरू असताना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे सांगतात ते करतात, हे आता या लोकांना कळायला लागले आहे. शिंदेसाहेब नेहमी 'दाढीला हलक्यात घेऊ नका'असे सांगत असतात, ते का? हे आता यांना पटले असेल. आमच्यावर टीका करण्यापेक्षा 'उबाठा'ने स्वत:च्या पक्षाकडे लक्ष दिले पाहिजे.
येणाऱ्या 2029 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शून्य होणार आहे. एवढेच नाही तर महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर वर्षभरात या पक्षाचे अस्तित्वही दिसणार नाही, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. शहराचा पाणी प्रश्न खऱ्या अर्थाने महायुती सरकारने सोडवला. मात्र महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेला ब्रेक लावण्याचे काम केले. आता तेच योजना का? रखडली म्हणून मोर्चा काढणार असतील तर हा ढोंगीपणा आहे, असा आरोपही शिरसाट यांनी केला.
संभाजीनगरकरांना दररोज पाणी देण्याचा शब्द एकनाथ शिंदे आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या महिनाभरात हा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळेच उबाठाने या प्रश्नावर आंदोलनाचा घाट घालत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असला तरी आम्ही तो हाणून पाडू असेही संजय शिरसाट म्हणाले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.