

Municipal elections Maharashtra : ठाकरे बंधूंच्या युतीमुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ठाकरे ब्रँडची कसोटी ठरवणारी ही निवडणूक असल्याने उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांनी स्वतः निवडणुकीच सूत्रे हाती घेतली आहे.
विभागप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना बाजूला सारत ‘मातोश्री’, ‘शिवतीर्था’वर निश्चित होत असलेल्या उमेदवाराला AB फाॅर्म दिले जात आहे. ठाकरे बंधूंची ही रणनीती शिवसेना अन् मनसेमधील बंडखोरी कितपत रोखण्यात यशस्वी ठरेल, याची चर्चा आहे.
शिवसेना (Shivsena) आणि मनसेमध्ये विभागप्रमुख किंवा जिल्हाप्रमुखांना निवडणूक काळातील निर्णय प्रक्रियेत मोठं स्थान दिलं जातं. उमेदवार निश्चित झाल्यानंतर AB फाॅर्म त्यांच्या मार्फत दिले जातात. परंतु या वेळी स्वतः ठाकरे बंधू उमेदवारांना भेटत आहेत. शिवसेनेचे AB फाॅर्म थेट ‘मातोश्री’वरून आणि मनसेचे AB फाॅर्म ‘शिवतीर्था’वरून दिले जाणार आहेत. नेत्यांमधील ‘अर्थपूर्ण’ व्यवहार आणि वशिलेबाजीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 30 डिसेंबरच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतरच मुंबईच्या राजकारणात ‘गद्दारी’ झाली की ‘निष्ठा’ टिकली, हे उघड होईल.
शिवसेना ठाकरे आणि मनसे (MNS) एकत्र आल्याने जागा वाटपावर मोठी रस्सीखेच आहे. ज्या जागांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे तिथे मनसेला संधी दिल्यास किंवा मनसेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने उमेदवार, उभा केल्यास स्थानिक पातळीवर नाराजी निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी ठाकरे बंधूंनी लक्ष घातलं आहे. ज्यांना तिकीट नाकारले जाईल त्यांना भविष्यात महामंडळे किंवा स्वीकृत सदस्यपदाचे गाजर दाखवून शांत करण्याची रणनीती आहे.
मुंबईसह राज्यातील महापालिका सत्तासंघर्षात आता ‘मातोश्री’, ‘शिवतीर्थ’ एकाच बाजूने मैदानात उतरल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बंडखोरी रोखण्यासाठी राजकीय ‘सर्जिकल स्ट्राइक’ची रणनीती अवलंबली आहे.
मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळू नये, यासाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे मैदानात आहेत. उमेदवारी देताना बंडखोरी उफाळू नये, यासाठी ठाकरे बंधूंकडून सर्व रणनीती वापरल्या जात आहेत. यामुळेच दोन्ही पक्षांनी आपली ‘अधिकृत उमेदवार यादी’ जाहीर न करण्याचे ठरवले आहे. ज्या उमेदवाराचे नाव निश्चित झाले आहे, त्याला शेवटच्या क्षणी फोन करून बोलावले जाईल अन् थेट ‘AB फाॅर्म’ सुपूर्द केला जाईल.
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेत इच्छुकांची संख्या जास्त आहे. सहाजिक नाराजांची फौज वाढणार आहे, आणि ती फौज काय तिथं टिकणार नाही. यात काही निवडून येण्याची क्षमता असलेले देखील आहेत, त्यांना खेचण्यासाठी त्यांना ‘मशाल’ चिन्हावर लढवण्याची चाचपणी ‘मातोश्री’तून होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.