Pune News : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar Murder Case) हत्या प्रकरणी पाच पैकी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर तीन आरोपी निर्दोष सुटले आहेत. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि 5 लाख दंड, अशी शिक्षा 'सीबाआय'च्या विशेष न्यायालयानं सुनावली आहे. दोघांना झालेल्या शिक्षेच्या निकालावार दाभोलकर कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले असले तरी उर्वरित तिघांविरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुण्यातील सीबीआयच्या (CBI) विशेष न्यायालयाने आज निकालाचे वाचन केले. यावेळी नरेंद्र दाभोलकर यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. निकालाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर मीडियाशी बोलताना डॉ. हमीद दाभोलकर व मुक्ता दाभोलकर यांनी हायकोर्टात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.
ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांना शिक्षा सुनावली, ही समाधानकारक बाब आहे. ही 11 वर्षांची लढाई महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्त्यांसह सर्वांनी महत्वाची भूमिका बजावली. 11 वर्षानंतर विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय दृष्टीपथात येतो, ही आमची भावना आहे, असे मुक्ता दाभोलकर म्हणाल्या. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तीन आरोपींची निर्दोष सुटका झाली असून त्यावर हायकोर्ट (High Court) आणि सुप्रीम कोर्टापर्यंत (Supreme Court) लढाई सुरू राहील, असे हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केले आहे. अद्याप पूर्ण निकाल हाती आलेला नाही, त्यामुळे तिघांची निर्दोष सुटका कशी झाली, हे अद्याप समजले नाही. निकाल हाती आल्यानंतर वकिलांकडून त्याचा अभ्यास केला जाईल, त्यानंतर हायकोर्टात अपील केले जाईल, असे मुक्ता दाभोलकर यांनी स्पष्ट केले.
ज्यांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या आहेत, त्यांना शिक्षा झाली. पण त्यांच्या डोक्यात हे कुणी भरवलं हे पाहणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या यंत्रणा पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करत आहेत. या सर्व यंत्रणांनी मास्टरमाईंट शोधायला हवा. हा एका व्यापक दहशतवादी कटाचा भाग असल्याचे सीबीआयनेच म्हटले आहे. त्याचा तपास सीबीआयनेच करायला हवा, अशी अपेक्षा मुक्ता यांनी व्यक्त केली.
आता सुटलेले मधले सुत्रधार आहेत, मुख्य सुत्रधार अजून सापडलेले नाहीत. त्याचा तपास व्हायला हवा. त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत विवेकी विचारवंतांना धोका कायम राहणार आहे. दरम्यान, वकिलांनाही तीन निर्दोष सुटलेल्यांविरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे हमीद दाभोलकर म्हणाले.
मीडियाशी बोलताना वकील म्हणाले, या केसमध्ये 72 साक्षीदार होते. पण केवळ 20 साक्षीदार तपासण्यात आले. अनेक साक्षीदार पोलिसांचे तपासी अधिकारी आहेत. कुठल्याही महत्वाच्या साक्षीदारांना येथे आणले गेले नाही. केवळ आरोपींना शिक्षा देण्यासाठी ही घाई झाली का, हे समजत नाही. तपासात गडबड झाल्याचे सत्र न्यायाधीशांच्या निदर्शनास या गोष्टी आल्या आहेत. त्यानुसार तिघांना निर्दोष सोडण्यात आले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.