
Hindi imposition row : राज्य सरकारने ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सुत्राचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे. त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांनी हे अध्यक्षपद स्वीकारायलाच नको होते, शालेय शिक्षणात त्यांचा अभ्यास नाही, सरकारला हवा तसा अहवाल ते देणार... असे दावे, आरोप नरेंद्र जाधव यांच्यावर होत आहेत. एका मुलाखतीमध्ये त्यांनी सर्व आरोपांना सडेतोड उत्तरे दिली आहे.
सध्याच्या हिंदी, मराठी वादावरून सुरू असलेले राजकारण आणि आरोपांवर नरेंद्र जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशांत कदम यांच्या यू ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी टीकाकारांचा उल्लेख टिकोजीराव असा केला आहे. तुम्ही प्राथमिक शिक्षण मराठीतून घेतले आहे. तरीही तुमची प्रगती होऊ शकते, मग आता हे तीन भाषा लादण्याचे कारण काय, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी असा उल्लेख केला.
डॉ. जाधव म्हणाले, माझ्या समितीची शिफारस काय असणार आहे, हे तुम्ही मुळीच गृहित धरता कामा नये. जी समिती गठितच झाली नाही, त्याचा निष्कर्ष तुम्हाल कुठल्या अंर्तज्ञानाने प्राप्त होतो, मला सांगा. जे मला माहित नाही, ते मी करणार हे तुम्हाला कसे माहिती. ही ढोंगबाजी आहे. ही दिशाभूल करणारी वृत्ती आहे. त्याचा मी तीव्र भाषेत निषेध करतो. माझी या समितीवर नियुक्ती झाली, हा मी माझा बहुमान समजतो. पुढील अनेक वर्षे लक्षावती बालकांचे भविष्य घडवणारी जी नीती आहे, त्याबाबत शिफारस करण्याची महनीय जबाबदारी माझ्यावर आली आहे. आणि हे टिकोजीराव म्हणतात, मी स्वीकारायलाच नको होती. मी काय करायचं, हे मी ठरवणार की हे टिकोजीराव ठरवणार.
जी नीती येणार आहे, त्यामुळे पुढील 25 वर्षे कोट्यवधी बालकांना उभारी देणारी ही नीती, त्याची शिफारस करण्याची संधी मला मिळाली आहे. माझा प्रयत्न असेल की, जास्तीत जास्त बालकांच्या उभारणीसाठी जास्तीत जास्त उपयुक्त ठरेल, जो पूर्णपणे निष्पक्षपणे, प्रामाणिकपणे सरकारला सादर करणे, हे माझे कर्तव्य आहे. त्यावर लोकांनी निवडून दिलेले सरकार निर्णय घेईल, असे डॉ. जाधव म्हणाले.
गठित न झालेल्या समितीच्या अहवालामध्ये काय असेल, हे गृहित धरून मुद्दाम चिथावणी देण्याचे काम जे करत आहेत, ते मराठीच्या भवितव्यासाठी अत्यंत घातक आहे. इथे अकारण राजकारण आणलं जात आहे. माझा राजकारणाशी संबंध नाही आणि असणारही नाही. सरकारचा हेतू काय आहे, हे मला माहित नाही. मी सरकारचा प्रवक्ता नाही, राजकारणी नाही, त्यामुळे यात कुठलीही भूमिका घेणार नाही. जास्तीत जास्त चांगला अहवाल देणे, एवढेच माझे काम आहे, असेही डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.
समितीचे काम नेमके असे असेल, हे सांगताना डॉ. जाधव म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील नेमकं त्रिभाषा सूत्र काय आहे, त्याचा नेमका अर्थ काय आहे, जे करण्यात आलेले नाही, तिथून माझी सुरूवात असेल. भारतातील अनेक राज्यांमध्ये त्रिभाषा सुत्राची अंमलबजावणी कशी झाली, कितपत झाली आहे, त्याचाही समिती अभ्यास करेल. राज्यस्थान, उत्तर प्रदेश, तमिळनाडूत तिसरी भाषा कोणती असेल, याचा अभ्यास केला जाईल. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत. सगळ्या शाळांमध्ये कोणती भाषा कितवीपासून सक्तीची केली जाते, याचाही मी साकल्याने अभ्यास करणार आहे. या सगळ्यांचा अभ्यास करून मी तांत्रिक स्वरुपाचा परंतु वस्तुस्थितीवर आधारीत अहवाल सादर करणार आहे.
मराठी-हिंदीच्या वादावर बोलताना मला राजकीय वादात शिरायचं नाही, असे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले. परंतु मराठी भाषा ही प्रचाराची, प्रसाराची भाषा झाली पाहिजे. मराठीचा इतरांचा जेवढा अभिमान आहे, तेवढाच मलाही अभिमान आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असेही डॉ. जाधव यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.