

Mumbai News : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या NDA प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे. मात्र, या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर नुकतीच सुप्रिया सुळे यांनी पक्षातील खासदारांसह मोदींची भेट घेतली. या भेटीसाठी सुरुवातीला दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. मात्र, ही बैठक जवळपास अर्धा तास चालल्याने राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले.
‘विलिनीकरणाच्या चर्चा ना दिल्लीत, ना गल्लीत’
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी या चर्चांना स्पष्टपणे नकार दिला आहे. ‘विलिनीकरणाच्या चर्चा ना दिल्लीत आहेत, ना गल्लीत’, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटींचा अर्थ पक्षाच्या NDA प्रवेशाशी जोडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नेत्यांच्या भेटीगाठी या विविध राजकीय किंवा वैयक्तिक कारणांसाठी होऊ शकतात. लोकसभा किंवा विधानसभा यांसारख्या सभागृहांमध्ये कोणती भूमिका मांडायची, यासंदर्भातही चर्चा होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक भेटीचा संबंध विलिनीकरणाशी जोडणे योग्य नसल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले.
प्रशांत किशोरांच्या चर्चेवरही अनिल पाटलांचं स्पष्टीकरण...
दरम्यान, रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या राष्ट्रवादीतील कथित भूमिकेवरूनही राजकीय चर्चा सुरू आहेत. प्रशांत किशोर यांच्यामुळेच अमित शाह यांनी सुनेत्रा पवार यांना भेटीसाठी वेळ दिला नसल्याची चर्चा होत आहे. यावर अनिल पाटील यांनी अशी कोणतीही ठोस माहिती आपल्याकडे नसल्याचे सांगितले.
प्रशांत किशोर किंवा अन्य कोणती व्यक्ती पक्षातील नेत्यांना भेटली असेल, तर त्यात गैर काय, असा सवालही त्यांनी केला. मात्र, नेमकी भेट झाली आहे की नाही, याची माहिती आपल्याला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही राजकीय चर्चा सुरू आहेत का, याबाबतही अनिल पाटील यांनी अनभिज्ञता व्यक्त केली. ‘आमच्या पक्षात आणि प्रशांत किशोर यांच्यात काही ठरलं असेल, तर त्याची कल्पना मला नाही’, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होणार?
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पदावरून हटवले जाणार असल्याच्या चर्चांनाही वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत प्रशांत किशोर यांनी सल्ला दिल्याची चर्चा आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यात यासंदर्भात बैठक झाल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय कोणाच्या सल्ल्याने घेतला जात नाही, असे अनिल पाटील यांनी स्पष्ट केले. हा पक्षाचा अंतर्गत विषय असून त्याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची असल्याचे त्यांनी सांगितले.
‘प्रदेशाध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा नाही’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनिल पाटील यांच्या नावाचीही चर्चा असल्याचे बोलले जात आहे. यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. सूत्रांकडून जशा बातम्या समोर येतात, तशाच आपल्या सूत्रांकडूनही माहिती मिळत असल्याचे सांगत, प्रदेशाध्यक्षपदाबाबत आपल्या नावाची कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्याला सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्यातच आनंद असून पक्षाने भविष्यातही अशीच संधी द्यावी, अशी इच्छा असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले.