
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने शरद पवार यांनी ती लगेच मान्य केलेली नाही. असे असले तरी प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसेच युवा नेते व आमदार रोहित पवार यांनी आज दिले.
नागपुरात रोहित पवार यांनी मीडियाशी बोलताना याबाबत संकेत दिले. ते म्हणाले, अनुभवी आणि रस्त्यावर उतरणाऱ्या युवा नेत्याच्या हाती नेतृत्व सोपवायला हवे. असा नेता आम्ही शोधला आहे. मी आत्ताच कोणाचे नाव सांगणार नाही. कोणाचे नाव घेतले तर शेपूट वाढत जाते. नंतर निर्णय घेताना बऱ्याच अडचणी येतात. मात्र वरिष्ठ नेत्यांना ते नाव माहीत आहे, ते योग्य वेळी निर्णय घेतील, असे सांगून त्यांनी नेतृत्व बदलाचे संकेत दिले.
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी रोहित पवार आज नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधाला. प्रदेशाध्यक्ष प्रश्नावर ते म्हणाले, जयंत पाटील यांनी भावनिक होऊन नेतृत्व केले. त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. याचा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. जयंत पाटील देशाच्या राजकारणात गेल्यास प्रदेशाध्यक्ष म्हणून एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला संधी दिली जावी. त्याने पक्षासाठी दाहा ते पंधरा वर्षापासून प्रामाणिक केले असावे.
मला प्रदेशाध्यक्ष व्हायचे नाही, असे सांगत रोहित पवार म्हणाले, एखादे संघटनात्मक पद घेऊन मी काम करण्याचे ठरवले आहे. मोठे नेतेसुद्धा अशा पद्धतीने निर्णय घेऊन काम करतात. अशा पद्धतीने खालपर्यंत काम केल्यास सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार यांच्यासोबत अनेक नेत्यांनी संघर्ष केला आहे. ते सर्व अनुभवाने मोठे आहेत. सध्याच्या परिस्थितीत धोरणात्मक निर्णय घेणारा आणि धावपळ करणारा असे वेगवेगळे नेतृत्व असणे आवश्यक आहे.
वरिष्ठांनी देशपातळीवर काम करावे, मार्गदर्शन करावे तर युवा नेत्यांनी रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावे, असे काही पदाधिकाऱ्यांना वाटते. जे विरोधात गेले त्या सर्वांना विश्वासात घेण्याचे काम सुरू आहे. मात्र उद्या काय होईल असे सांगता येत नाही. याकडे पवारांनी लक्ष वेधले.
देशावर संकटे येतात तेव्हा सर्वच जण एकत्र येतात. पक्ष बाजूला ठेवला जातो. पाकिस्तान युद्धाच्या वेळी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. पाकिस्तान जो धडा शिकवला त्याचे कौतूक केले. मात्र हे कुठल्या व्यक्तीचे नव्हे तर पदाचे कौतुक आहे. भारतीय सैन्याचे आम्ही कौतुक केले आहे. यापूर्वी इंदिरा गांधी यांनासुद्धा त्यावेळी अटलबिहारी बाजपेयी यांनी पाठिंबा दिला होता. हा विषय आता संपला आहे. उद्या शेतकरी, कष्टकऱ्यांचा विषय आला तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही विरोधात बोलू, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.