Laxman Hake gives explanation: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजातील तणाव वाढत असताना ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला दिलेल्या आंतरजातीय विवाहाच्या आव्हानानंतर मोठी खळबळ उडाली. या विधानावरुन मराठा समाजाकडून हाकेंवर शिवीगाळ आणि टीका हेऊ लागली. या टीकेला आता त्यांनी फेसबूक पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा इथं झालेल्या सभेत हाकेंनी आंतरजातीय विवाहासंदर्भात विधान केलं होतं.
मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्ट झाल्यानं आता दोन्ही समाजांमध्ये आंतरजातीय विवाह व्हावेत, असा प्रस्ताव लक्ष्मण हाके यांनी मांडला होता. यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत असताना, हाकेंनी आता आपण हे विधान का केलं? याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, हे वक्तव्य फक्त जातीयवादाच्या नागाला बिळातून काढण्यासाठी आणि पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांच्या खोट्या चेहऱ्यांना उघड करण्यासाठी केलं होतं.
"मराठा समाज आता ओबीसी समाजात आला आहे. आता तुमच्यात आणि आमच्यात आंतरजातीय विवाह झाला पाहिजे. तुम्ही आता पहिल्यांदा ११ विवाह जाहीर करा. आमच्याकडे ११ पोरं तयार आहेत. असं ते म्हणाले होते. हे वक्तव्य केल्यानंतर मराठा समाजाकडून त्यांच्यावर टीका झाली आणि बीडमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यानंतर हाके यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, "आंतरजातीय विवाहचा प्रस्ताव मांडला तर शिव्यांची लाखोली वाहिली जाते. शाहूंचे वारसदार व्हायला तुम्हाला शंभर जन्म घ्यावे लागतील. शाहूंनी त्यांच्या भगिनींचा विवाह होळकरांच्या घरात लावून दिला होता, शंभर वर्षांपूर्वी तो विचार होता. आज असा विचार मांडला तरी मारून टाकण्याची धमकी दिली जाते. धन्य ते महात्मा फुले, शाहू राजे, बाबासाहेब"
हाके पुढे लिहितात की, "जातीयवादाचा नाग हा फक्त बिळातून बाहेर काढण्यासाठी मी हे वक्तव्य केलं होतं. त्यांचा पुरोगामी पुरोगामी म्हणवून घेत बहुजन बांधवांचे शोषण करणारा काळाकुट्ट चेहरा महाराष्ट्र समोर मांडायचा होता, उघडा पाडायचा होता, दाखवायचा होता. हे फक्त समाजातील पुरोगामी विचारसरणीच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाला उघड करण्यासाठी होतं. ओबीसी मागासलेपण जन्मानं येतं, त्यासाठी अडथळे पार करावे लागतील.
हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बोलताना म्हटलं की, "मागासलेपण (ओबीसी) मागून मिळत नसतं तर ते जन्मानं येतं. त्या-त्या मागास जातीत जन्म झाल्यानं आमच्या पिढ्यांनी शेकडो वर्षे सामाजिक भेदभाव सहन केला. आमची माणसं खोट्या जातवर्चस्व भावनेसाठी निवडून मारली. नितीन आगे, खैरलांजी, माऊली सोट सारखे शेकडो बळी जातिवर्चस्वासाठी घेतले. तुम्हाला सामाजिक दृष्ट्या मागास (ओबीसी) व्हायचं आहे ना तर मग सामाजिक मागासांचे हार्डल्स पार करावे लागतील ना! शिव्या देऊन, जीवे मारण्याची धमकी देऊन कसे चालेल बरं"
(ता. क. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र शासन 50000 बक्षीस देते. शाहू महाराजांनी संस्थानात 100 विवाह आंतरजातीय लावून दिले होते.)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.