
Sangli News : राज्यात आगामी स्थानिकच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत सध्या इनकमिंग वाढले आहे. ज्याला सांगली जिल्हाही अपवाद नाही. विधानसभेच्या तोंडावर भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या निशिकांत भोसले-पाटील यांनी आपली पक्षातील जागा पक्की केली असून त्यांनी जिल्ह्यातील चार एक माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला. याचे बक्षीस म्हणून त्यांना अजित पवार यांनी जिल्हाध्यक्ष केलं आहे. यानंतर आता निशिकांत पाटील दुसरा डाक टाकण्यास तयार असून ते यावेळी अजित पवार यांचा रखडलेला दौरा यशस्वी करण्याच्या तयारीत आहेत. तसेच या दौऱ्यात जिल्ह्यातील महत्वाच्या काही नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचेही संकेतही त्यांनी दिले आहेत. तर यात काँग्रेसच्या एका बंडखोर नेत्याचेही नाव असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. ज्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा सांगलीत मास्टर स्ट्रोक मारणार असे चित्र सध्या तयार झाले आहे.
याबाबत निशिकांत पाटील यांनी माहिती दिली आहे. त्यांनी, स्थानिकच्या पार्श्वभूमिवर अजित पवार यांचा रखडलेला दौरा होण्याची शक्यता व्यक्त केलीय. तर याच दौऱ्यात काही पक्ष प्रवेश होणार असून दादा आपल्या पक्षाचे येथे लॉचिंग करणार आहेत. तसेच ते येथे प्रशासकीय बैठकही घेणार असून उद्योजक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर अजित पवार यांचा यावेळी भरगच्च कार्यक्रम होणार असून ज्यात 6 एक बैठकाच होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, माजी आमदार विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, राजेंद्रअण्णा देशमुख आणि शहर अध्यक्ष पद्माकर जगदाळेंसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पाटील यांनी राष्ट्रवादीच्या 26 व्या होणाऱ्या बालेवाडीतील वर्धापन दिनाला जिल्ह्यातून 5 हजार कार्यकर्ते जाणार आहेत. तर आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर सदस्य नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून 1 लाख वीस हजार सदस्यांचे टार्गेट असणार आहे. नुकताच चार माजी आमदारांनी प्रवेश केल्याने राष्ट्रवादीत भक्कम पाठबळ मिळाले आहे. तर आगामी काळात जिल्ह्यातील आणखी काही नेते प्रवेश करणार आहेत. जे वर्धापन दिनानंतर होणाऱ्या अजित पवार यांच्या दौऱ्यात होतील.
जिल्ह्यात जयंत पाटील आणि निशिकांत पाटील यांच्यातील राजकीय कटूता सगळ्यांना माहित आहे. पण जयंत पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील तुम्ही त्यांचे स्वागत करणार का या प्रश्नावर निशिकांत पाटील यांनी, दोनच शब्दात उत्तर देत काहीच अडचण नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी, अजित पवार यांच्या नेतृत्वात कुणी काम करायला तयार असेल तर त्यांचे स्वागत आहे. पण सध्या त्यांच्याच पक्षात जे प्रदेशाध्यक्षपदावर आहेत. त्यांनाच पाय उतार व्हा अशा शब्दात पदाधिकारी सुनावत असतील ते आमच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करतील का हा महत्वाचा प्रश्न असल्याचेही म्हटलं आहे.
तीन पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची नुकतीच बैठक पार पडली असून स्थानिकवर चर्चा झाली आहे. या चर्चेप्रमाणे स्थानिकमध्ये महायुती म्हणूनच सामोरं जाण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातही महायुतीच म्हणून निवडणूक लढवली जाईल. तसेच जिल्ह्यात सध्याच्या घडीला पक्षाची बांधणी चांगली झाली असून लवकरच जिल्हाभर मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तर शहराध्यक्ष जगदाळे यांनी पालकमंत्री तथा भाजप नेते चंद्रकात पाटील यांच्याबरोबर केलेल्या चर्चेप्रमाणे लवकरच शासकीय समित्यांचे वाटपही समसमान केले जाणार असल्याचेही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान काहीच दिवसांपूर्वी दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी काँग्रेससह इतर पक्षातील बड्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी खलबतं केली होती. त्याप्रमाणे काँग्रेसच्या बंडखोर नेत्या तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यासह अन्य काही नेत्यांना राष्ट्रवादीत येण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. त्यामुळे अजित पवार यांच्या या दौऱ्यात जयश्रीताई पाटील यांच्यासह अन्य काही बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण त्या खरचं राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? हे प्रत्यक्ष मेळाव्याच्या दिवशीच समोर येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.