Pune News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना महाराष्ट्राबाहेर नागालँडमध्ये सर्वात मोठा झटका बसला आहे. दादांच्या पक्षातील नागालँडमधील सर्वच्या सर्व सात आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या सर्व आमदारांनी सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. महाराष्ट्राबाहेर याच राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार होते. या धक्क्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांना पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
पुण्यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला असल्याचा समोर आला आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, 'लाडकी बहीण योजना जेव्हा लागू करण्यात आली तेव्हा आमच्याकडे फार कमी काळ होता. दोन-तीन महिन्यातच निवडणुका लागणार होत्या. त्यामुळे या सर्व गोष्टी तपासण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. तरीदेखील आपण जे यासाठी पात्र नाहीत त्यांनी अर्ज करू नका असे आवाहन केलं होते. मात्र तसे झाले नाही, काही जणांनी अर्ज केले असल्याचं आता समोर आले आहे. ज्यांना पैसे देण्यात आले आहेत त्यांचे पैसे आता आपण परत घेऊ शकत नाही. मात्र, यापुढे पात्र लाभार्थ्यांनाच मोबदला देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
ज्या सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी याचा लाभ घेतला. त्यांच्यावर कारवाई करणार का ? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, कशाला त्यांच्यावर कारवाई करायला लावता. चुकले असेल त्यांचे असे म्हणत अजित पवारांनी त्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नागालँडमधील सात आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) साथ सोडली आहे. त्याबाबत विचारला असता अजित पवार म्हणाले, ते सात आमदार मला दोन-तीन महिन्यापूर्वी भेटायला आले होते. ते प्रचंड अस्वस्थ होते. कारण त्यांची काम होत नव्हती. याबाबत मी तिथल्या मुख्यमंत्र्यांची आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी बोललो होतो. मात्र, ते सर्व आमदार अस्वस्थ होते ही बाब खरी आहे.
याबाबत मी अधिकची माहिती घेणार आहे. वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांना दिली असून त्यांच्याकडून याबाबतचे अधिकची माहिती मी घेणार आहे. मात्र, याबाबत मला त्या आमदारांनी यापूर्वी देवगिरी बंगल्यावर येऊन तक्रारी केल्या होत्या. याबाबत मुख्यमंत्र्यांशी देखील माझे बोलणे झाले होते ते देखील या गोष्टींमध्ये लक्ष घालत होते. त्यामुळे याबाबत अधिकची माहिती मी घेणार असून या नेत्यांवर पक्षांतर्गत बंदी कायदा लागू होत नाही. कारण सर्वच्या सर्व सात आमदारांनी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे अजित पवार म्हणाले.
कांद्याचे पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणार
अचानक आलेल्या पावसामुळे जे कांदा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. त्याबाबतचे पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. हे पंचनामे झाल्यानंतर त्याबाबतचा योग्य तो मोबदला देण्याची कारवाई सरकारकडून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या निधीची पूर्वीच तरतूद करण्यात आली असून केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील अशा परिस्थितीमध्ये निधी मिळतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.