
Solapur, 24 January : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक मातब्बर नेत्यांनी रामराम केला होता. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण सोलापूर जिल्ह्याचाही समावेश होता. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा लढवली होती. तेव्हापासून सोलापूरचे जिल्हाध्यक्ष रिक्त आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला जिल्हाध्यक्ष कधी मिळणार, असा प्रश्न आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी पुन्हा जुन्या नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. मात्र, अजितदादा जुन्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्याला पसंती देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला रायगडची सुनील तटकरे यांची एकमेव जागा जिंकता आली होती. त्या निवडणुकीतील दारुण अपयशामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी अजित पवारांची साथ सोडणे पसंत केले होते. अनेक वर्षांपासून अजितदादांसोबत राहून सत्तेची फळे चाखलेल्या अनेक नेत्यांचा त्यात समावेश होता.
सोलापूरचे (Solapur) जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर पदाचा राजीनामा दिला होता. सेनापतीनेच ऐनवेळी मैदान सोडल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला होता. तसेच, बबनराव शिंदे आणि संजय शिंदे या बंधूंनीही घड्याळावर निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. तेव्हापासून सोलापूरचे जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे. जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी पक्ष सोडला तरी अजितदादांनी जिद्द सोडली नव्हती. लोकसभेतील नामुष्कीजनक कामगिरीनंतर त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आणि विधानसभेत पक्षाला चांगले यश मिळाले.
भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्या नेत्यांनी अजितदादांची साथ सोडली होती, त्यांनीही पवारांची भेट घेतली आहे. दीपक साळुंखे यांनीही अजित पवार यांची भेट घेतली आहे. तसेच, माजी आमदार संजय शिंदे यांनीही पवारांची भेट घेऊन चर्चा केली आहे. दीपक साळुंखे आणि संजय शिंदे हे दोघे नेतेही जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छूक असल्याची चर्चा आहे.
माजी जिल्हाध्यक्ष साळुंखे, माजी आमदार संजय शिंदे यांच्याशिवाय माढ्यातून विधानसभा निवडणूक लढवलेले मीनल साठे यांचे पती दादासाहेब साठे यांनीही जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे अजितदादा कुणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
निष्ठावंतांचा विचार होणार का?
लोकसभेतील पराभवानंतरही मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे अजितदादांबरोबर कायम राहिले होते. त्यामुळे जिल्हाध्यक्षपद देताना निष्ठावंतांचा विचार होणार की सोयीचे राजकारण करणाऱ्यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडणार हेही पाहावे लागणार आहे.
उमेश पाटील पुन्हा सक्रीय होणार का?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवक्ते पदाची जबाबदारी पार पाडणारे उमेश पाटील यांच्यावर मोहोळच्या कार्यक्रमात खुद्द अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही टीका केली होती. त्यामुळे निराश झालेल्या उमेश पाटलांनीही अजितदादांची साथ सोडली होती. मात्र, विधानसभा निकालानंतर आपण दादांसोबत कायम असल्याचे म्हटले होते. मात्र, पक्षाच्या कार्यक्रमात ते आतापर्यंत कुठेही दिसलेले नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.