

सोलापूर जिल्ह्यात भाजपची मोर्चेबांधणी वेगात — ११ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या निर्णयानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यरात्रीपर्यंत महत्त्वाच्या नेत्यांशी बैठकांचे सत्र घेतले.
महत्त्वाच्या नेत्यांची भेटीगाठी वाढल्या — समाधान आवताडे, प्रशांत परिचारक, संजयमामा शिंदे, दीपक साळुंखे, रश्मी बागल यांसारख्या नेत्यांसोबत पंढरपूर नगरपरिषदेसह करमाळा नगरपालिकेवर महत्त्वाची चर्चा झाली.
विठ्ठल परिवाराचे आव्हान आणि भाजपचा प्रतिसाद — प्रणिता भालके यांच्या संभाव्य उमेदवारीला गांभीर्याने घेत भाजप सर्वपक्षीय नेत्यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे.
Solapur, 14 November : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरासह सोलापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे, त्यादृष्टीने भाजपकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यासाठी पालकमंंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी (ता. १४ नोव्हेंबर) मध्यरात्रीपर्यंत बैठका घेत होते. त्यांच्या भेटीसाठी अनेक मातब्बर नेत्यांनी हजेरी लावली. या भेटीनंतर गोरे, आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात मध्यरात्री पंढरपूर नगरपरिषदेसंदर्भात खलबतं केली.
नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री गोरे गुरुवारी पंढरपूरमध्ये (Pandharpur) आले होते. ते रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील बड्या नेत्यांना भेटत होते. त्यात आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, संजयमामा शिंदे, दीपक साळुंखे, रश्मी बागल, विलास घुमरे आदींचा समावेश होता. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत गोरे यांच्या भेटीगाठी सुरू होत्या.
दीपक साळुंखे यांच्या भाजप (BJP) प्रवेशाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, तो अजूनही होऊ शकलेला नाही. रश्मी बागल यांच्या मावशी आणि विलास घुमरे यांच्या पत्नी जयश्री घुमरे इच्छूक आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने या दोघांनी पालकमंत्री गोरे यांची भेट घेऊ शकलेली असू शकते. करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांची करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात अजूनही भूमिका स्पष्ट होऊ शकलेली नाही. त्यांनीही गोरेंशी चर्चा केली आहे.
पंढरपुरात विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या सत्तेला सुरुंग लावण्याची तयारी केली होती. विशेषतः आमदार अभिजीत पाटील यांचाही त्यात समावेश होता. मात्र, विठ्ठल परिवाराच्या झालेल्या बैठकीनंतर त्याच रात्री आमदार पाटील हे तातडीने मुंबईला रवाना झाले होते. त्या दौऱ्यानंतर पाटील हे काहीसे बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे.
विठ्ठल परिवाराने प्रणिता भालके यांच्या माध्यमातून आव्हान देण्याचा प्रयत्न चालवला आहे. भालके यांच्या नावाविषयी पंढरपूरच्या राजकारणात आजही आकर्षण आहे. त्या भालकेंचे आव्हान भाजप गांभीर्याने घेताना दिसत आहे. त्यातूनच सर्वपक्षीय नेतेमंडळींशी संपर्क साधला जात आहे. अनेकांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले जात आहे.
भाजपने सोलापूरमध्ये कोणत्या निवडणुका स्वबळावर लढवायचे ठरवले?
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायतीची निवडणूक.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कोणत्या नेत्यांसोबत चर्चा केली?
समाधान आवताडे, प्रशांत परिचारक, संजयमामा शिंदे, रश्मी बागल आणि दीपक साळुंखे.
विठ्ठल परिवार कोणत्या उमेदवाराला पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे?
प्रणिता भालके.
भाजप सतत बैठका का घेत आहे?
भालकेंच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आणि नेत्यांना आपल्या गोटात आणण्यासाठी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.