

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन तारीख जाहीर करण्यात येईल.
साठे यांचा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुंबईत झालेल्या भेटीत निश्चित झाला, जिथे ते नातवाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते.
शरद पवार गटात मान-सन्मान न मिळाल्याने साठे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांच्या प्रवेशामुळे समविचारी आघाडीचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Solapur, 06 November : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच घरवापसी होणार आहे. त्याला खुद्द साठे यांनी दुजोरा दिला असून कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पक्षप्रवेशाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे साठे यांनी स्पष्ट केले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे (Baliram sathe) यांनी नातू जयदीप साठे यांच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत नुकतीच भेट घेतली. त्या भेटीतच साठे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे. या भेटीवेळी आमदार राजू खरे, जयदीप साठे व इतर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून अपमानास्पदरित्या उचलबांगडी करण्यात आल्यानंतर बळीराम साठे यांनी पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, खुद्द पवारांनी समजूत घातल्यानंतर साठे यांनी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवारांनी (Sharad Pawar) ‘सोलापूर जिल्ह्यातील पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत बळीराम साठे यांचा सहभाग असेल,’ असे जाहीर केले होते. तसे, पक्षात मानसन्मान मिळेल, असे सांगितले होते.
शरद पवार यांनी शब्द देऊनही पक्षात मानसन्मान मिळत नसेल पाहून बळीराम साठे यांनी वडाळ्यात कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा मेळावा घेत यापुढे शरद पवार यांच्या पक्षाशी आपला यापुढे कुठलाही संबंध नसेल, असे जाहीर केले होते. त्या वेळी त्यांनी कुठल्याही पक्षात न जाता स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचे ठरविले होते.
मध्यंतरी मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका समविचारी आघाडी करून लढविण्याबाबत चर्चा झाली होती. त्या बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, बळीराम साठे, दीपक गायकवाड, विजयराज डोंगरे, सीमा पाटील, मानाजी माने उपस्थित होते. त्यामुळे समविचारीच्या माध्यमातून जोरदार लढतीची अपेक्षा होती. मात्र, साठे यांच्या निर्णयानंतर समविचारी आघाडीचे काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत बळीराम साठे म्हणाले, नातवाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली. त्या भेटीत राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा झाली आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन लवकरच पक्षप्रवेशाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. मला पद मिळावे; म्हणून पक्षात जात नसून सत्तेच्या माध्यमातून सर्वसामन्यांची कामे होतील, या उद्देशाने मी पक्षप्रवेश करीत आहे. कायकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेल्यानंतर पक्षप्रवेशाची तारीख जाहीर केली जाईल.
Q1. बळीराम साठे कोणत्या पक्षात जाणार आहेत?
A1. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
Q2. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख कधी जाहीर होईल?
A2. कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर तारीख निश्चित केली जाईल.
Q3. साठे यांनी शरद पवार गट सोडण्याचे कारण काय दिले?
A3. पक्षात मान-सन्मान न मिळाल्याने त्यांनी शरद पवार गट सोडला.
Q4. या निर्णयाचा कोणत्या आघाडीवर परिणाम होईल?
A4. साठे यांच्या प्रवेशामुळे समविचारी आघाडीच्या योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.