

Sangli News: स्वबळावर सत्ता आणण्यासाठी दिग्गजांना पक्षात प्रवेश दिल्यानंतरही सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला ‘बॅकफूट’वर जावे लागले. गतवेळेपेक्षा यावेळी १० जागांचा फटका बसला. नेत्यांची फौज आली तरी मतदारांनी मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचे दिसले. त्यामुळे भाजपला निकालावर चिंतन करावे लागेल. जिल्हा परिषदेच्या ६१ पैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सर्वाधिक १८ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरला. भाजप दुसऱ्या आणि काँग्रेस तिसऱ्या स्थानी राहिली आहे. शिवसेनेनेही खानापूर, आटपाडीत मुसंडी मारून पुन्हा एकदा ताकद दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या स्थानावर राहिला.
महापालिका आणि जिल्हा परिषदमध्ये स्वबळावर सत्ता आणण्यासाठी भाजपने वर्षभरात जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील दिग्गज नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन आपली ताकद वाढवली होती. त्यामुळे भाजप स्वबळ आजमावणार याचा अंदाज होता. मात्र, महापालिकेत कशीबशी सत्ता राखण्यात यश आले. तर जिल्हा परिषदेत सत्तेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी गतवर्षी खानापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैभव पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यानंतर पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन आपली ताकद वाढवली.
जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे यांनी कडेगाव येथे जाऊन माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि त्यांचे चुलत बंधू संग्रामसिंह देशमुख यांच्यातील भाऊबंदकी संपवून समेट घडवला. तसेच काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील आणि काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना भाजपमध्ये घेऊन मिरज तालुक्यातही भाजपने आपली ताकद वाढवली. मात्र, त्याचा निवडणुकीत फायदा झाला नसल्याचे दिसते.
खानापूरमध्ये वैभव पाटील यांना पक्षात घेऊनही नगरपालिका आणि जिल्हा परिषदेला सपशेल पराभव पत्करावा लागला, तर पलूस-कडेगावमध्ये गतवेळी आठपैकी सहा जागा जिंकल्या होत्या. मात्र देशमुख बंधू आणि शरद लाड यांचा करिश्मा यावेळी चालला नाही. दोन्ही तालुक्यांत एकही जागा आली नाही. गेल्यावेळी भाजपचे जिल्हा परिषद २६ सदस्य होते. मात्र ज्यावेळी भाजपला तब्बल दहा जागांचा फटका बसला आहे. भाजप थेट १६ जागांपर्यंत खाली आली आहे.
जिल्ह्यात भाजपची जत, मिरज तालुक्यांवर सत्ता होती. गतवेळीही याच २ तालुक्यांनी भाजपला हात दिला होता. जत तालुक्यात ९ पैकी तब्बल ८ जागा भाजपने जिंकल्या, तर मिरज तालुक्यात ११ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या. त्यामुळे या २ तालुक्यांनी भाजपला १६ जागांपर्यंत नेऊन तारले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी ‘अंडरस्टँडिंग’ करून भाजपसमोर आव्हान उभे केले होते. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत काही जागांवर निवडणूकपूर्व केलेली आघाडीही भाजपला अडचणीत आणणारी ठरली आहे. त्यामुळेही भाजपला फटका बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.