
सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुराची परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे 24 सप्टेंबरला दौऱ्यावर येणार आहेत.
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून सतत पाऊस होत असून 124 गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे; शेतीपिके, घरांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.
लांबोटी व वडकबाळ पुलांवर पाणी येऊन सोलापूर-पुणे आणि सोलापूर-विजयपूर महामार्गावरील वाहतूक बंद किंवा वळवण्यात आली आहे.
Solapur, 23 September : सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उद्या (ता. 24 सप्टेंबर) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. तसेच, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हेही सोलापूरमध्ये असणार आहेत.
दरम्यान, सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. आता मुख्यमंत्री (Chief Minister) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्या दौऱ्यानंतर तरी ओला दुष्काळ जाहीर होऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो का? हे पाहावे लागणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे करमाळा तालुक्यातील पूरस्थिती आणि नुकसानाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्र्यासेाबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन असणार आहेत. पण एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे बार्शीतील नुकसानीची पाहणी करून धाराशिवच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. अजित पवार मात्र मुख्यमंत्र्यासोबत असणार आहेत
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे हेही उद्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. उपमुख्यमंत्री पवारांसह ते माढा तालुक्यातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी जाऊ शकतात.
सोलापूर जिल्ह्यात गेली दोन महिन्यांपासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठची शेती वाहून गेली आहे. घरादारात पाणी शिरले आहे, त्यामुळे शेतातील उभ्या पिकांसह घरातील धनधान्यही भिजले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांपुढे जगायचे कसे, असा प्रश्न आहे.
सीना नदीला आलेल्या महापुराचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 124 गावांत शिरले आहे. अनेक गावे सीना नदीच्या महापुराने वेढली आहेत. सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील लांबोटी पुलाला पाणी लागल्याने एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दोन्हीकडील वाहतूक एकाच म्हणजे नव्या पुलावरून सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत या पुलाला पाणी लागले होते.
दुसरीकडे, सोलापूर-विजयपूर महामार्गावरील दक्षिण सोलापूरमधील वडकबाळ येथील पुलालाही पाणी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूला महामार्गावर पाणी आल्याने सोलापूर-विजयपूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक कामती, मोहोळमार्गे वळविण्यात आली आहे.
प्र: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूरला कधी येणार आहेत?
उ: २४ सप्टेंबर रोजी ते पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर येतील.
प्र: कोणकोणते मंत्री या दौऱ्यात सहभागी असतील?
उ: मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन आणि कृषिमंत्री भरणे.
प्र: सोलापूर जिल्ह्यात किती गावांना पुराचा फटका बसला आहे?
उ: सीना नदीच्या महापुरामुळे तब्बल 124 गावे पाण्याखाली गेली आहेत.
प्र: महामार्ग वाहतुकीवर काय परिणाम झाला आहे?
उ: लांबोटी पुलावरील एका बाजूची वाहतूक बंद झाली असून वडकबाळ पुलाजवळ पाणी शिरल्याने सोलापूर-विजयपूर मार्ग वळवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.