
Solapur, 13 January : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी राज्य सरकार अजिबात गंभीर नाही. बीड, परभणीमधील प्रकरणाचे रोज नवनवे पैलू दिसून येत असून नवनवीन माहिती समोर येत आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणांत गंभीर नाहीत. या प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, मात्र तोही घेत नाहीत. त्यामुळे हे सरकार निगरगठ्ठ झाले आहे, असा आरोप सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.
खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) ह्या सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त सोलापुरात आल्या आहेत. अक्षता सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी संतोष देशमुख खूनप्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा आणि मोका दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. त्यावरून शिंदे यांनी सरकारवर टीका केली.
त्या म्हणाल्या, संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खून प्रकरणी दररोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. पण, राज्य सरकार आणि मुख्यमंत्री त्याबाबत गंभीर नाहीत. वाल्मिक कराडच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून तोही घेतला जात नाही. एकंदरितच हे सरकार अतिशय निगरगठ्ठ बनल्याचे दिसून येत आहे.
संतोष देशमुख यांना तब्बल चार तास ज्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं आहे, ते अत्यंत वाईट होते. त्याचा मी निषेध करते. हे प्रकरण आता संपूर्ण राज्यात आणि देशभरात गेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस असं म्हणाले की, ‘जनावराला असं मारलं तरी अंगावर शहारे येतात, हे तर माणसाला मारत आहेत. हे असं बीड जिल्ह्यात पहिल्यांदा झाले नाही, तर बीड जिल्हा हा अशा गोष्टींसाठी प्रसिद्धच आहे, असा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला.
बीड जिल्ह्यातील अशी प्रकरणे आत्तापर्यंत झाकले गेलेली आहेत. मात्र, संतोष देशमुख खून प्रकरणानंतर जो उद्रेक झाला आहे, त्यामुळे आता त्यांना हे भोगावं लागणार आहे. या खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
सिद्धरामेश्वराच्या यात्रेबाबत खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सिद्धरामेश्वराची यात्रा ही आपल्या गावाची आणि जिल्ह्याची आहे. यामध्ये अनेक भक्त या अक्षता सोहळ्यात रमले आहेत. माणुसकीचे सागर सिद्धारामेश्वरांचे चरण स्पर्श करून आम्ही सर्वजण नतमस्तक झालो आहोत. सिद्धरामेश्वराकडे प्रार्थना करत आहोत की, सर्वांच्या इच्छा, अपेक्षा, मनोकामना पूर्ण होऊदे. हे वर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागात राहून कष्ट करणाऱ्यासाठी सुखाचं आणि समृद्धीच जावो, अशी प्रार्थनाही प्रणिती यांनी सिद्धरामेश्वराच्या चरणी केली.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.