
Karad, 01 June : काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांची आजही भाजपला गरज भासत आहे. काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशामुळेच भाजप आज मोठा पक्ष दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेसमुक्त देश करायला निघालेली भाजप कधी काँग्रेसयुक्त झाली, हे भाजप नेत्यांना सुद्धा कळले नाही. सत्तेच्या जीवावर मोठी झालेली भाजप संघटना फार काळ टिकू शकणार नाही. कारण जी ताकद काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे, ते कधीही भाजपला जमणार नाही, असे भाकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपबाबत केले.
कऱ्हाड (जि. सातारा) येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोचला आहे, त्यामुळे समाजातून काँग्रेस कधीही संपणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यापासून देशाला प्रगतीच्या वाटेवर आणण्यापर्यंत काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात काम केले आहे.
देश आता स्थिरस्थावर झाल्यानंतर फेक नेरिटिव्ह आणि खोटे आरोप करून भाजप (BJP) आयते सत्तेवर आला आहे. पण भाजपलाही त्यांची संघटना वाढविण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांचीच गरज भासत आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी प्रवेश केल्यामुळेच आज भाजप मोठा पक्ष दिसत आहे. मात्र, निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आजही काँग्रेस (Congress) मजबुत स्थितीत आहे, असाही दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करून आणि जनतेची दिशाभूल करून भाजप २०१४ मध्ये सत्तेवर आली आहे. पण, पुढे न्यायालयाने काँग्रेसच्या मंत्र्यांवर झालेले सर्व आरोप सिद्ध न झाल्यामुळे निकाली काढले. सर्व माजी मंत्र्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. पण तोपर्यंत काँग्रेसचे सरकार गेले होते. पण काँग्रेसच्या नेत्यांवर आणि सरकारवर बिनबुडाचे आरोप करून सत्तेवर आलेल्या भाजपच्या मंत्र्यांवर मोठमोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पुराव्यासहित आरोप असूनही एकाही मंत्र्यावर भाजपने कारवाई केली नाही.
भाजपकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही. सरकारकडून विकासाचे जे आकडे दाखविले जात आहेत, ते खोटे आकडे असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. भाजपकडे स्वतःचे कार्यकर्ते किंवा केडरबेस नाही, त्यामुळे देशातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाला आजही काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांची गरज भासते आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
भाजप हा काँग्रेसमुक्त भारत करायला निघाला होता. मात्र, विविध नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपच काँग्रेसयुक्त झाली आहे. सत्तेच्या जीवावर वाढलेली भाजप संघटना फार काळ टिकू शकणार नाही. काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जी ताकद आहे, ते कधीही भाजपला जमणार नाही, असा दावाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.