
Solapur, 07 July : मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशवंत माने यांचा झालेला पराभव हा माजी आमदार राजन पाटील यांच्या चांगला जिव्हारी लागला आहे. त्याबाबतची वाच्यता त्यांनी तब्बल आठ महिन्यांनंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात केली. पाटील परिवारामुळे यशवंत माने यांचे मोठे नुकसान झाले, त्यांना आमच्यावरील रोष सहन करावा लागला, असे विधान पाटील यांनी केले. मात्र, चूक लक्षात येताच त्यांनी पाटील परिवाराकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले गेल्यामुळे माने यांना पराभवाला सामोरे जावे लागले, अशी कबुली त्यांनी दिली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे श्रीधर मार्तंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane), याशिवाय मोहोळ विधानसभा मतदारसंघातील बहुतांश नेतेमंडळी उपस्थित होते. राजकीय नेत्यांच्या भाषणांमुळे हा कार्यक्रम गाजला.
माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil)यांनी प्रथमच जाहीररित्या मोहोळमधील पराभवावर भाष्य केले. बोलण्याच्या ओघात त्यांनी ‘पाटील परिवारामुळे यशवंत माने यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, त्यांनी त्याबाबत अद्याप एक अवाक्षरही काढले नाही,’ असे सांगितले. पण, त्यानंतर आपले विधान दुरुस्त करत राजन पाटील यांनी ‘पाटील परिवाराकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले गेले, त्यामुळे यशवंत माने यांना पराभव पत्करावा लागला,’ असे स्पष्टीकरण दिले.
विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने यांनी अवघ्या एका फोनवर यशवंत माने (Yashwant Mane)यांना आपल्या गटाचा पाठिंबा जाहीर केला. त्या निवडणुकीत माने यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी मदत केली, असेही राजन पाटील यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार दिलीप माने यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भाष्य केले. अविनाश मार्तंडे यांना तिकीट देऊ नये, यासाठी तालुक्यातून आम्हाला फोन येत होते. मात्र, आमच्या सोबत आलेल्या मार्तंडे त्यांना तिकीट देत निवडून आणले, असा किस्सा माने यांनी सांगितला.
विधानसभा निवडणुकीत यशवंत माने यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत माने यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी पाठिंबा दिल्यामुळे आमच्या गटाकडून म्हणावी तशी ताकद यशवंत माने यांना मिळाली नाही, अशी कबुलीही माने यांनी दिली.
दिलीप मानेंचा एकत्र लढण्याचा प्रस्ताव
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आपण एकत्रितपणे लढू. तीनही गटांतून विजय मिळविण्याचा प्रयत्न आपण करू, असा प्रस्ताव माजी आमदार दिलीप माने यांनी माजी आमदार यशवंत माने यांना दिला. बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने आणि माजी आमदार यशवंत माने हे दोन्ही गट एकत्र आले होते. यशवंत माने गटातूनच अविनाश मार्तंडे यांना बाजार समितीच्या संचालकपदाची उमेदवारी देण्यात आली होती. हे दोन्ही माने एकत्र आल्यास उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय समीकरणांची नव्याने मांडणी होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.