

Kolhapur Politics : राजकारणात कधीच कोणी कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कट्टर विरोधक अशी ओळख असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीत घाटगे यांनी कागल नगरपरिषदेसाठी युतीची घोषणा केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः प्रसिद्धी पत्रक काढून युती झाल्याची माहिती दिली. पण या अचानक आणि अनपेक्षित घोषणेमुळे कार्यकर्ते अजूनही गोंधळात आहेत.
मागील काही दिवसांपासून कागल नगरपरिषदेमध्ये घाटगे आणि मुश्रीफ एकत्र येणार अशी चर्चा होती. मात्र हा प्रस्ताव फेटाळल्याचे समोर आले होते. त्यानंतर घाटगे आणि माजी खासदार संजय मंडलिक यांची युतीबाबत चर्चा झाली होती. सकारात्मक पावले पडत असताना काही तासांतच अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळे माजी खासदार संजय मंडलिक यांना वगळून घाटगे आणि मंत्री मुश्रीफ यांनी घाटगेंसोबत युती केली आहे. मंगळवारी दोघेही एकत्र पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडणार आहेत.
मुश्रीफ यांनी परिपत्रकात काय म्हंटलं?
आज राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी- कागल यांची कागल नगरपरिषदेमध्ये आघाडी झाली. ही घटना इतकी अनपेक्षितपणे घडली की, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करता आली नाही. याबाबत मी या सर्वांची माफी मागतो. तसेच माझे ज्येष्ठ मित्र, माजी आमदार संजयबाबा घाटगे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घ्यावा लागला. त्याबद्दल त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो.
या आघाडीमुळे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही. आपल्या झालेल्या चर्चेपासून मी ढळणार नाही. उलट शिर्षस्थ नेतृत्वाबरोबर बसून त्यांच्या कार्यकर्त्यांना जास्त दिलासा कसा मिळेल, याबाबत मी प्रयत्न करीन. माझ्या व संजयबाबांच्या चर्चेमधून गैरसमज पण दूर होईल, याची मला खात्री आहे.
सदर आघाडी ही कागल शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी व विनाकारण सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी व जनतेला भरभरून कसे देता येईल, यासाठी झालेली आहे. यामध्ये कोणताही दुसरा हेतू नाही. याबाबत मंगळवार दि. १८ रोजी चार वाजता मटकरी हॉलमध्ये मी व समरजीतसिंह घाटगे अशी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका आणि पुढील दिशा स्पष्ट करणार आहोत, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान; कागल तालुक्यामध्ये अशी आघाडी पहिल्यांदाच झालेली नाही. इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे. टोकाचा संघर्ष होऊनसुद्धा त्यावेळच्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी आघाड्या केल्या होत्या. कै. शामराव भिवाजी पाटील व कै. सदाशिवराव मंडलिक, कै. सदाशिवराव मंडलिक व कै. विक्रमसिंहराजे घाटगे, मी स्वतः व माजी आमदार संजयबाबा घाटगे. यावरून कागल तालुका हे जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ का झाले? हे समजू शकेल.
परंतु; यामध्ये "ईडी" ची एक दुर्दैवी व कडवी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणे साहजिक आहे. चर्चेअंती तो संभ्रम व गैरसमज दूर झाला. "देर आये..... दुरुस्त आये.....!" आता आपली सर्वांची जबाबदारी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीच्या नगराध्यक्षसह सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आणणे. त्यासाठी आपण सर्वजण जिवाचे रान करू. बाकी; सर्व पत्रकार परिषदेमध्ये मन मोकळे करू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.