Satara News : महाराष्ट्रात केसीआर यांच्या भारत राष्ट्र किसान समितीच्या वतीने विकासाचा तेलंगणा पॅटर्न राबवला जाणार आहे. त्यासाठी विधानसभेच्या २८८ मतदारसंघात पक्षाचे काम सुरू आहे. सातारा जिल्ह्यातही पक्ष पोहोचला असून जिल्ह्यात तेलंगणाच्या विकासाचे रोल मॉडेल घराघरात पोचवले जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २० ते ३० हजार सभासद नोंदणी झाली आहे, अशी माहिती तेलंगणा भारत राष्ट्र समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांनी दिली.
माणिकराव कदम Manikrao Kadam यांनी शासकीय विश्रामगृहात तेलंगणाच्या Telangana Pattern विकास मॉडेल संदर्भात आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी समन्वय समितीचे विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष संदीप साबळे, महिला आघाडीच्या वैजयंती कदम व शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व समितीचे जिल्हा संघटक शंकरराव गोडसे उपस्थित होते.
श्री. कदम व विजय देशमुख म्हणाले, गेल्या अकरा वर्षात महाराष्ट्रात साठ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. शेतीसाठी मोफत पाणी, शेतीमालाला भाव, दर्जेदार खते, पेरणीच्या वेळी शेती खर्चासाठी मदत, शेतमालाच्या खरेदीची राज्य सरकारकडून हमी, उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला योग्य भाव आणि शेतीची डिजिटल नोंदी या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.
मात्र महाराष्ट्रात राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या गोष्टी होताना दिसत नाहीत. याउलट नऊ वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या तेलंगणासारख्या राज्यांत के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली जल ऊर्जा, सौरऊर्जा, औष्णिक ऊर्जा या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. येथे शेतीला चोवीस तास मोफत वीज, सात हजार शेतीमाल खरेदी केंद्रे, यासाठी शासनाने पाच लाख कोटी रुपये खर्च केला आहे.
मेंढपाळांना ७५ टक्के अनुदान देऊन मेंढ्या पुरवल्या जातात. वृध्दांना तीन हजार रुपये मदत, शेतकऱ्याला दहा हजार रुपये एकरी अनुदान दिले जाते. या तेलंगणा मॉडेलचा महाराष्ट्रात प्रसार करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय किसान समिती सक्रिय झाली असून महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ मतदारसंघांत संपर्क संवाद यात्रा सुरू आहे. आत्तापर्यंत पक्षाकडे दोन लाख तीस हजार सभासदांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री आमचाच असेल.
सातारा जिल्ह्यातही पक्षाचे काम सुरू असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये तेलंगणाच्या विकासाचे रोल मॉडेल घराघरात पोहोचवले जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २० ते ३० हजार सभासद नोंदणी झाली आहे.या माध्यमातून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्ण ताकतीने पक्ष उतरणार असून आमची कोणाशीही युती नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्य मतदारांना बरोबर घेऊनच महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडविण्याचे बीआरएस समिती प्रयत्न करत आहे.
उदयनराजेंविरोधात लढणार....
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या माध्यमातून भारत राष्ट्र समिती साताऱा लोकसभा लढणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात समितीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.