
Kolhapur : राज्यात पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला गती आली असून कोल्हापुरसह सांगली जिल्ह्यातील 12 गावांनी आपला विरोध कायम ठेवला आहे. कोल्हापुरमध्ये शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधानंतर हा महामार्ग जिल्ह्यातून जाणार नाही अशी भूमीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली. पण आता त्यांनाच वाशिमचा रस्ता मुख्यमंत्र्यांनी दाखवल्याने जिल्ह्यातील विरोध हळहळू मोडीत काढण्यात येत आहे. तर आता यवतमाळ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाची जमिन वगळून मोजनीचे आदेश दीपक केसरकर यांनी दिले आहेत. यामुळे शक्तिपीठ महारामार्गाच्या अडथळ्याला कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि यवतमाळच्या शेतकऱ्यांकडून गती? दिली जातेय असेच काहीसे सध्याचे चित्र तयार झाले आहे.
कोल्हापुरमधून हा मार्ग जाऊ देणार नाही, अशी भूमीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली होती.तर राज्य सरकारने विरोध डावलून महामार्ग फोपल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिला होता. यानंतर जिल्ह्यात या महामार्गाच्या कामाच्या गतीला सध्यातरी ब्रेक लागला आहे.
पण शेतकऱ्यांच्या जमिनीला पाचपट दर द्या अशी मागणी भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे जिल्ह्यातच आता शक्तिपीठ महामार्गाला मागणी होताना दिसत आहे. पण खरा मुद्दा राहतो तो पाचपट दर मिळणार काय? आणि मिळालाच तर सर्व शेतकरी यासाठी तयार होणार का? हे पहावं लागणार आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ भुदरगड तालुक्यातील काही शेतकरी गोकुळचे माजी संचालक प्रा. दौलतराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आले होते. त्यांनी, बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीला पाचपट वाढीव दरासह शेतकऱ्यांना बदली जमीन द्यावी, अशी मागणी केलीय. हा मार्ग तालुक्याच्या नदीच्या पूरक्षेत्रातून जातो असा दावा करताना, शक्तिपीठ महामार्ग भुदरगड तालुक्याच्या विकासाची गंगोत्री ठरणार असल्याचे मत दौलतराव जाधव यांचे आहे.
तर तालुक्याला वैभवाचे दिवस यायचे असतील तर या मार्गाच्या निर्मितीशिवाय पर्याय नाही. शक्तिपीठ महामार्ग बदलल्यास तालुक्याचेच नुकसान होणार आहे. पर्यटन व औद्योगिक विकास खुंटणार आहे. यामुळेच तालुक्याच्या विकास साधणाऱ्या या महामार्गास आपला पाठिंबा असल्याचे दौलतराव जाधव यांनी म्हटले आहे. तर सध्या शक्तीपीठ महामार्गाबद्दल शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनाथ एकवटले असून भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत चे निवेदन शक्तीपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीने दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. तसेच या महामार्गाला या सर्व जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांचे समर्थन असल्याचा दावा महामार्ग शेतकरी कृती समितीने केला होता. तर काही स्वयंघोषित नेत्यांकडूनच याला विरोध होत असून त्यांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.
तर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात यवतमाळातील शेतकऱ्यांनीयवतमाळातील शेतकऱ्यांनी जमीन संपादनासाठी आपण तयार असून भूमिअभिलेख विभागाला सरकार्य करण्यास तयार असल्याचेही म्हटले होते. फक्त जमिनीचा मोबदला ठरविताना तो चर्चा करून बाजारभावाप्रमाणे द्यावा अशी मागणी त्यांची आहे. आता या महामार्गासाठी 27 जानेवारी रोजी नांदेड येथे 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा असून हे सर्व शेतकरी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनाच्या बाजूने आहेत.
एकीकडे कोल्हापूर, सांगलीत महामार्गाला मोठा विरोध होत असतानाच यवतमाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाच्या कामाला गती आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कबुलायतदार गावकर जमिनी वाटप करताना देवराई जमिनी आणि नियोजित शक्तिपीठ महामार्गाला लागणारी जमीन वगळून भूमिअभिलेख विभागाने मोजणी करावी असे आदेश आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे. याबाबत भूमिअभिलेख विभागाच्या बैठकीत त्यांनी आदेश दिले. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील लवकरच या महामार्गाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.