

Mahayuti deadlock Kolhapur : कोल्हापुर महानगरपालिकेसाठी जागावाटप संदर्भात होणारी महायुतीची बैठक नेत्यांच्या समनव्यामुळे बारगळली. मात्र काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र चर्चा केल्यानंतरही अद्याप समाधारक जागा मिळत नसल्याने तोडगा निघालाले नाही. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळत असल्याने युतीमधील चर्चा निष्फळ ठरली असल्याचे समोर येत आहे. मात्र त्यावर शनिवारी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत महायुतीत जवळपास 70 जागांवर एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे, उर्वरित 11 जागांवर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये स्पर्धा सुरू आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुतीच्या जागावाटपा संदर्भात नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. कोल्हापुरात मार्ग निघत नसल्याने जागा वाटपात संदर्भात पुण्यात बैठक झाली. पुण्यातही मार्ग निघत नसल्याने ही चर्चा मुंबईपर्यंत गेली. पण स्थानिक पातळीवरच समन्वयाने मार्ग काढा, अशा सूचना दिल्यानंतर कोल्हापुरात शुक्रवारी बैठकीचा आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर असल्याने बैठकीचा गणित फिस्कटले. दुसरीकडे शिवसेनेचे नेते नसल्याने मंत्री हसन मुश्रीफ हेही त्यांच्या नियोजित कार्यक्रमात राहिले. मात्र पक्षांतर्गत बैठकीचा सिलसिला सुरूच राहिला.
भाजपकडून आमदार अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक आणि जयंत पाटील यांच्याकडून बैठक घेण्यात आली. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. राज्य मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची आणि आदिल फरास यांच्यात चर्चा झाली. तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप आणि शिवसेना यांच्या नेत्यांशी स्वतंत्र चर्चा केली.
सामंजस्याने, सन्मानाने तोडगा काढण्याची शक्यता एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. यासाठी थोडा वेळ लागणार आहे. फॉर्म्युलाच ठरलेला नाही, तर उमेदवारांची यादी जाहीर कशी करणार, असा प्रश्न महायुतीतील तीनही पक्षांना पडला आहे. यामुळे आज पुन्हा बैठक घेऊन जिथे एकमत झाले आहे, त्या जागा जाहीर करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवाय सोमवारी महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
ज्या जागांवर एकमत होणार नाही, त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता सद्य:स्थितीला आहे. मात्र, असे झाल्यास विरोधकांना त्याचा फायदा होईल, ही शक्यता गृहीत धरून मैत्रीपूर्ण लढतसुद्धा होणार नाही, याची काळजी मोठा भाऊ म्हणून दोन पक्षांतील प्रमुख घेत असल्याचेही समजते. याबाबत वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट बोलणे टाळले आहे. काँग्रेसची यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीची यादी जाहीर करण्याबाबत एक मतप्रवाह आहे. त्यातील काही नाराज या पक्षांकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘वेट अँड वॉच’ चाही फॉर्म्युला महायुतीकडून घेतला जात आहे.
दरम्यान, भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) युतीची घोषणा झाल्यानंतर जवळपास 70 जागांवर एकमत झाले आहे. एकमत झालेल्या जागांवर उमेदवारांना अर्ज तयार ठेवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. ऐनवेळी कोणत्याही उमेदवाराला अडचणी येऊ नये किंवा धांदल उडू नये याची काळजी महायुतीकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांनी तयारीत रहावे अशा सूचना देखील नेत्यांकडून देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.