

यावर्षीच्या प्रचंड उन्हाळ्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने राज्यासमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धरणातील उपलब्ध पाणी आता केवळ 12.04 TMC इतके उरले असून, त्याचा थेट परिणाम शेती आणि वीजनिर्मितीवर होऊ लागला आहे.
विशेष म्हणजे, महाजेनकोकडे वीजनिर्मितीसाठी फक्त 0.58 TMC पाणी शिल्लक असल्याने 1 जूननंतर कोयना प्रकल्पातील वीजनिर्मिती बंद करण्याची वेळ येऊ शकते.
गेल्या काही दिवसांपासून धरणातील पाणीसाठा वेगाने घटत असल्याने प्रशासनाने पाणी वापराबाबत सतर्कता वाढवली आहे. कोयना नदीतून 65 दिवस सुरू असलेले दरवाजे 24 मे रोजी बंद करण्यात आले. या कालावधीत तब्बल 6.91 TMC पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. सध्या पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, आजपर्यंत वीजनिर्मितीसाठी 32.37 TMC पाणी वापरण्यात आले आहे.
पूर्व भागातील सिंचनासाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी वाढली होती. त्यानुसार धरणातून पाणी सोडण्यात आले; मात्र आता सिंचनाचा कोटाही संपत आल्याने 31 मेनंतर 2100 क्युसेकचा विसर्ग बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते.
धरणातील कमी होत चाललेला साठा पाहता प्रशासनाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पाण्याचा अत्यंत जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. पावसाळा लांबल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. दरम्यान, महाजेनकोने शासनाकडे अतिरिक्त पाण्याची मागणी केली असली तरी उपलब्ध साठा मर्यादित असल्याने आता प्राधान्याने केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच पाणी राखून ठेवले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.