
Solapur, 03 March : विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज निवडणूक जाहीर केली आहे, त्यानुसार येत्या 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. पाचपैकी तीन जागा भाजपच्या, तर प्रत्येकी एक जागा ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्याची संधी यानिमित्ताने महायुतीच्या नेत्यांना मिळाली आहे.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून माजी आमदार प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे विधान परिषदेसाठी इच्छूक आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळून प्रशांत परिचारकांना संधी देणार की त्यांचे निकटवर्तीय सातपुते, राऊतांना लॉटरी लागणार, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, तर शिवसेनेकडून आमश्या पाडवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर हे विजयी झाले आहेत. त्यामुळे विधान परिषदेतील या पाचही जागा रिक्त झाल्या आहेत. या पाच जागा आमदारांच्या मतदावर निवडून द्यायच्या आहेत, त्यामुळे रिक्त जागा त्या त्या पक्षाला मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा आमदारांच्या मतदानातून विधान परिषदेच्या या पाच जागा निवडून दिल्या जातात. विधानसभेतील महायुतीचे संख्याबळ पाहता विरोधी पक्षाचा एकही आमदार निवडून येण्याची शक्यता नाही. मात्र, भाजपचे तीन, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार निवडून येऊ शकतो. त्यामुळे महायुतीने विधानसभा निवडणुकीत ज्या इच्छुकांना थांबवले आहे, त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून संधी मिळू शकते.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंढरपूर मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक हे इच्छुक होते. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली असती तर भाजपचे आमदार समाधान आवताडे यांची अडचण झाली असती. तो धोका ओळखून परिचारक यांनी थांबावे, यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले होते. त्यांचा सांगावा घेऊन खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे परिचारक वाड्यावर आले होते.
समर्थकांच्या प्रचंड दबावामुळे परिचारक यांच्यासोबत बावनकुळे यांना दोन तासांपेक्षा जास्त वेळ चर्चा करावी लागली होती. त्या वेळी परिचारक यांनी वरिष्ठांच्या शब्दाला मान देत निवडणुकीतून माघार घेतली होती. त्या वेळी बावनकुळे यांनी प्रशांत परिचारक हे लवकरच विधीमंडळात दिसतील, असे विधान केले होते. आता फडणवीस-बावनकुळे हे आपला शब्द पाळून परिचारकांना विधीमंडळात पाठवणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
फडणवीस यांचे निकटवर्तीय माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी पक्षाच्या आदेशानुसार सोलापूरमधून लोकसभेची, तर माळशिरसमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेत संधी मिळावी, अशी त्यांची मागील काही दिवसांपासूनची रणनीती असल्याचे दिसून येत आहे.
बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेत जाण्याची इच्छा आहे. रावसाहेब दानवे यांनी नुकत्याच केलेल्या दौऱ्यात त्याबाबतची अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांडून व्यक्त करण्यात आली होती. दानवेंनीही राऊतांच्या कामाची पक्ष नक्कीच दखल घेईल, असे विधान केले होते, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तिघांपैकी कोणाला संधी मिळते, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.