
Sangli News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला राज्यभर विरोध होत आहे। शेतकरी याविरोधात रस्त्यावर उतरले असून काही शेतकरी या महामार्गाच्या बाजूने आहेत. यामुळे काही ठिकाणी महामार्गाच्या मोजणीला आता सुरूवात झाली आहे. मात्र या मोजणीला सांगली जिल्ह्यातील शेटफळे या गावात तीव्र विरोध होताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या पथकाला विरोध केला असून एकरी दीड कोटीने भरपाई द्या, मगच शेतात पाय ठेवा, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान याची माहिती मिळताच आटपाडी येथे तहसील कार्यालयात शक्तिपीठ महामार्गासंबंधी प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी बाधित शेतकऱ्यांसमवेत बैठक घेतल्याचेही कळत आहे.
दरम्यान प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्याशी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी, महामार्गाला विरोध नसून, आधी भरपाई जाहीर करा अशी ठाम भूमिका घेतली. तसेच शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई म्हणून एकरी दीड कोटी रुपये जाहीर करण्याचीही मागणी केली. या मागण्या मान्य झाल्यातरच मोजणीसाठी शेतात पाय ठेवायला देवू अशीही आक्रमक भूमिका घेतली. यामुळे महामार्गाच्या मोजणीसाठी आलेले पथक मोजणी न करता माघारी परतावे लागले आहे.
शक्तिपीठ महामार्ग आटपाडी तालुक्यातील शेटफळेमधून जाणार आहे. त्यासाठी गत वर्षी खुणा केल्या आहेत. गावातील 63 गटातील दीडशे एकर क्षेत्रातून हा महामार्ग जाणार आहे. त्यामुळे 200 वर शेतकरी बाधित होणार आहेत. येथे अनेकांचे बंगले आहेत. डाळिंब, द्राक्षबागा, शेततळी, विहिरी, जलवाहिन्या आहेत. पाणी आल्याने तलावातील गाळ भरून शेती विकसित केली आहे. या शेतीतून नुकतेच उत्पन्न सुरू झाले आहे. काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत.
अनेक जण कायमचे विस्थापित होण्याची शक्यता आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी महसूल विभागाने शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. मोजणीला पथक आले, त्यावेळी शेतकऱ्यांनी मोजणीला तीव्र विरोध केला. तणाव वाढल्यावर तहसीलदार सागर ढवळे आले. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र शेतकऱ्यांचा विरोध कायम राहिला. त्यामुळे पथक माघारी परतले. ‘आमचा विरोध महामार्गाला नाही, आधी एकरी दीड कोटी भरपाई जाहीर करा, मगच मोजणीसाठी शेतात पाय ठेवा,’ यावर शेतकरी ठाम आहेत.
प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी शेतकऱ्यांची विट्याला दोनदा, तर तहसीलदार सागर ढवळे यांच्यासमवेत एकदा बैठक झाली. बैठकीत तोडगा न निघाल्याने त्या निष्फळ ठरल्या. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम राहिला आहे. बैठकीत भरपाईवर चर्चा केली जात नाही. अधिकारी कायदा आणि अन्य भीती दाखवतात. विरोध कराल तर भरपाई कमी देऊ. न्यायालयात गेल्यास आणखी कमी भरपाई देऊ, अशी भीती घातली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणखी संतप्त झाले आहेत. ‘विरोध महामार्गाला नाही, आधी भरपाई जाहीर करा, मग पुढील प्रक्रिया राबवा. भीती दाखवणे थांबवा, अन्यथा महामार्गालाच विरोध करू,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.