
Prabhakar Gharge : मतदारसंघात मी एकट्यानेच पाणी आणलंय, अशा आविर्भावात वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींचे संतुलन बिघडले आहे. ते आमदार होण्याअगोदर २००७ मध्ये खासदार शरद पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाण्याचे पूजन आम्ही केले आहे.
पाणी त्याचवेळी मतदारसंघात आले आहे. त्यामुळे ‘मी’पणा सोडून सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवा. (कै.) अभयसिंहराजे भोसले, भाऊसाहेब गुदगे, सदाशिव पोळ, धोंडीराम वाघमारे यांचे योगदान विसरून जनतेची दिशाभूल करू नका, असा टोला महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त केले.
जायगाव (ता. खटाव) येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अनुराधा देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे, स्वाभिमानीचे अनिल पवार, शिवसेनेच्या सलमा शेख, इंदिरा घार्गे, बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार, सुनंदा राऊत, डॉ. महेश माने, डॉ. प्रियांका माने, तानाजी देशमुख, सूर्यभान जाधव, दत्तात्रय घार्गे, विश्वनाथ देवकर, मंगेश फडतरे, विकास जाधव, रमेश देशमुख, सचिन पाटील, दुर्गेश देशमुख, गौरीहर देशमुख, यशवंत देशमुख, सोमनाथ साठे आदींसह औंध गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
घार्गे म्हणाले, ‘‘उत्तर माण तालुक्यात पाणी देण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. गेली १५ वर्षे पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा हे समीकरण सुरू आहे. मी २५ वर्षे समाजकारणात काम करतोय, त्यामुळे खटाव- माणला एक चांगली दिशा देण्यासाठी, जनतेचे शोषण करणाऱ्या व कॉन्ट्रॅक्टर पोसणाऱ्या आमदाराला हद्दपार करण्यासाठी पाठबळ द्यावे.’’
अनुराधा देशमुख म्हणाल्या, ‘‘या तालुक्यात आपल्या विकासासाठी दोन प्रभाकर साहेब लाभले आहेत. दोन्हीही आमदार होणार आहेत. त्यामुळे विकासाची, पाणी योजनांची चिंता करू नका.’’ यावेळी संदीप मांडवे यांनीही जोरदार टीका केली.
औंध येथे झालेल्या पाणी पे चर्चा कार्यक्रमात औंधसह २१ गावांना मी लोकसभेच्या अगोदर प्रशासकीय मान्यता मिळवून देणार असल्याचे सांगितले होते. आता विधानसभा आली, तरी फक्त मीच देणार असा कांगावा करणे बंद करा.
आम्ही स्वतः २१ गावांतून फिरून प्रबोधन करून जनजागृती केली होती आणि त्याचा फायदा उठवण्याचा तुमचा डाव आम्ही यशस्वी होऊन देणार नाही, असे मत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी व्यक्त केले.
डोकी फुटली, पिढी बरबाद झाली
दोन भावांच्या भांडणात डोकी फुटली. पिढी बरबाद झाली. ‘तू कर मारल्यासारखं, मी करतो रडल्यासारखं’ या म्हणीप्रमाणे दोन्ही गोरे बंधूंनी आम्ही वेगळे असल्याचा भास दोन्ही तालुक्यांतील जनतेला करून दाखविला. लोकांनी विश्वास ठेवून गावोगावी वाईटपणा घेत भांडणे केली. डोकी फुटली. अजूनही युवक न्यायालयांमध्ये हेलपाटे मारत आहेत आणि आता पराभव दिसू लागल्याने एक होणार असल्याचे सांगत आहेत, असेही घार्गे म्हणाले.
...तर याद राखा
तालुक्यात कोण सुसंस्कृत आहे, हे जनतेला माहीत आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाइपमधून शेतीला पाणी दिले असल्याची दिशाभूल करणे अगोदर थांबवा. घार्गे यांच्यावर बोलताना तोंड सांभाळून बोला, असे मत सभापती दत्तात्रय पवार यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.