
Sangli News : काँग्रेसने बंडखोरी केली म्हणून वसंतदादा पाटील यांच्या नातसून तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांना निलंबित केले. यानंतर गेल्या सहा महिन्यापासून त्या राजकीय पुर्नवसनासाठी धडपडत होत्या. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ऑफर असतानाच त्या भाजपबरोबर गेल्या. पण प्रवेशावेळी त्यांनी काँग्रेसने आपल्यावर अन्याय केल्याची टीका केली. यावरून आता सांगलीत नवा वाद सुरू झाला आहे. तर जयश्री पाटलांनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आता काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपमध्ये प्रवेश करत असताना जयश्री पाटील यांनी काँग्रेसमध्ये अन्याय झाल्याचे सांगितले. तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. यावरून आता काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केलीय. त्यांनी काँग्रेसने त्यांच्या घराण्यात चारवेळा मुख्यमंत्रिपद, केंद्रात मंत्रिपद, आमदार, खासदार, पालिकेचे नेतृत्व दिले. हा फार मोठा ‘अन्याय’ होता. पक्षाने आमच्यावर, सामान्य कार्यकर्त्यांवर असाच ‘अन्याय’ करायला हवा, अशी उपरोधिक टीका केली आहे.
श्रीमती पाटील यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यानंतर त्यांचा भाजपप्रवेश का झाला? याचा खुलासा खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच केला होता. तर त्या वसंतदादा बँकेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठीच भाजपवासी झाल्याचा दावा, पृथ्वीराज पाटील यांनी केला. तर स्वत: जोखडातून मुक्त करताना सामान्यांनी, तसेच ज्या संस्थांनी विश्वासाने बँकेत ठेवी ठेवल्या होत्या, त्यांचेही हित होणे आवश्यक आहे. त्या ठेवींची जबाबारी कोणावर, हे देखील स्पष्ट करावे. नजीकच्या काळात बँकेत अडकलेल्या ठेवी संबंधितांना परत मिळाल्यास जयश्रीताईंनी केलेल्या पक्षप्रवेशाचा आनंद सर्वांनाच होईल. एका दृष्टीने सामान्यांना न्याय मिळेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
जयश्रीताईंच्या भाजपप्रवेशामुळे काँग्रेस खिळखिळी झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. पण मुळात ही चर्चाच निरर्थक असून विधानसभेच्या निवडणुकीत त्याचे उत्तर मिळाले आहे. वसंतदादा घराणे त्या निवडणुकीत माझ्याविरोधात मैदानात होते. परंतु त्यावेळी जयश्रीताईंची अनामत रक्कम देखील जप्त झाली होती. सध्या काँग्रेस राज्यात सत्तेत नसली, तरी देखील महायुतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील आमचे अनेक मित्र मंत्रिपदी आहेत. त्या ओळखीचा उपयोग करून त्यांच्या माध्यमातून विकासाची कामे करणे, हेच सध्या आपले धोरण आहे. कोणत्याही परिस्थितीत विकास कामांना खीळ बसता कामा नये, या उद्देशाने आपण काम करत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
जयश्री पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळू शकेल. एका दृष्टीने काँग्रेसमध्ये ‘स्पेस’ निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याची संधी घेऊन नवे लोक काम करतील.
यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी, महायुतीचे मंत्री आणि आघाडीतील नेते आम्ही अनेक कार्यक्रमांत एका व्यासपीठावर असतो. आमच्यात खेळीमेळीत संवाद होतो. एका कार्यक्रमात जशी खासदार विशाल पाटील यांना भाजपने पक्षप्रवेशाची ऑफर दिली, तशीच मलाही दिली होती. परंतु आमच्या संस्थेतील सर्व व्यवहार पारदर्शी असल्याने मला कशाची घाई नाही. मला काही लपवायचे नाही. माझा मुद्दा विकासाचा आहे. मला विकासाचे देणे-घेणे आहे. मी त्याला बांधील असल्याचेही पृथ्वीराज पाटील यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.