

अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच बिनविरोध परंपरा तुटली असून राष्ट्रवादीच्या उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल करून चुरशीची निवडणूक निर्माण केली.
छाननीत उज्वला थिटे यांचा अर्ज अपक्षाच्या आक्षेपामुळे बाद झाला आणि त्यामुळे राजन पाटील समर्थकांनी नगरपंचायतीसमोर मोठा जल्लोष केला.
या जल्लोषावेळी विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट चॅलेंज दिल्याने जिल्ह्यात मोठी राजकीय चर्चा रंगली आहे.
Solapur, 18 November : अनगर नगरपंचायतीची निवडणूक राज्यात सर्वाधिक चर्चेची ठरली आहे. या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांच्या साम्राज्याला प्रथमच आव्हान दिल्याने आतापर्यंतच्या बिनविरोधच्या परंपरेला ब्रेक लागला होता. अनगरच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर राजन पाटील समर्थकांनी नगरपंचायतीसमोर जल्लोष केला या वेळी पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज केले आहे. त्याची सोलापूर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
अनगर (Angar) ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर पहिलीची निवडणूक होती. त्या निवडणुकीत भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. आतापर्यंतच्या परंपरेनुसार अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा पाटील समर्थकांना होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला होता.
उज्वला थिटे यांना पोलिस बंदोबस्तात पहाटे जाऊन अर्ज दाखल करावा लागला, यामुळे अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची राज्यभरात चर्चा झाली. तसेच बिनविरोधची पंरपराही खंडीत झाली. मात्र, छाननीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला. त्यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आक्षेप घेतला. त्यानुसार थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनगर नगर पंचायतीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होताच नगरपंचायत कार्यालयासमोर माजी आमदार राजन पाटील समर्थकांनी जल्लोष केला. त्या जल्लोषात माजी आमदार राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत पाटील हेही सहभागी झाले होते. त्यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन जल्लोष केला.
या जल्लोषाच्या वेळी विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज केले आहे. ‘अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा....पण अनगरकरांचा नाद करायचा नाही’ अशा शब्दांत खुद्द विक्रांत पाटील यांनी चॅलेंज दिले आहे. त्यांच्या या आव्हानाची जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.
उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होण्याची कारणे
१) राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सही नाही
२) थिटे यांचा मतदान यादीतील प्रभाग आणि अनुक्रमांक चुकीचा आहे.
३) थिटे यांनी त्यांच्या वयाचा पुरावा अर्जासोबत जोडलेला नाही
४) सूचकाचा मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे
महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम 1966 आणि नगरपंचायत नगराध्यपक्षदाच्या थेट निवडीच्या अधिनियमानुसार अर्जाची चौकशी केली. त्यात उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद असल्याचे आढळून आले आहे, असेही निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी सांगितले.
1. अनगरची निवडणूक राज्यात चर्चेत का आली?
→ बिनविरोध परंपरा मोडून चुरशीची निवडणूक निर्माण झाल्यामुळे.
2. उज्वला थिटे यांचा अर्ज का बाद झाला?
→ अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे.
3. अर्ज बाद झाल्यानंतर काय झाले?
→ राजन पाटील समर्थकांनी नगरपंचायतीसमोर जल्लोष केला.
4. विक्रांत पाटील यांनी कोणाला आणि कशासाठी चॅलेंज केले?
→ त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना “अनगरकरांचा नाद करायचा नाही” असे म्हणत थेट आव्हान दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.