
Ratnagiri News : शिवसेना उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणात सध्या गळती लागली आहे. येथे अनेक पदाधिकाऱ्यांसह माजी आमदारांनी शिवसेनेची साथ सोडली आहे. यात माजी आमदार राजन साळवी यांचा देखील समावेश आहे. साळवींचा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करवून एकाच दगडात तिघांना शह दिला आहे. तसेच त्यांनी मोठा राजकीय फायदाही उचलला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजन साळवी यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाने मोठा फायदा होईल असे बोलले जात आहे. कोकणात ग्रामपंचायतीपासून ते थेट विधानसभा-लोकसभेपर्यंत शिवसेनेची एकहाती पकड होती. पण आता शिवसेनेतील विभाजनानंतर शिवसेना कमकुवत झाली आहे. येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने वर्चस्व निर्माण केलं आहे. जिल्ह्यातील पाचपैकी एकच जागा ठाकरे शिवसेना एक जागा (चिपळूण) राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि उर्वरित तीन ठिकाणी शिंदे शिवसेनेचे वर्चस्व आहे.
याचाच फायदा घेत ऑपरेशन शिवधन्युष्य करत उदय सामंत यांनी आमदार किरण सामंत यांच्या मदतीने रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर तालुक्यात शिवसेना फोडली. तालुकाप्रमुख आणि माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना आपल्याकडे खेचले. तर दुसऱ्या अंकात साळवी भूकंप घडवून आणला. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आणि आपल्यात कोणताच राजकीय हेवे दावे नसून साळवींच्या प्रवेशाला कोणतीही आडकाठी नसल्याचे सांगत हिरवा झेंडा दाखवला. यानंतर विविध तर्कवितर्क लढविले जात होते.
राजन साळवी विधानसभा निवडणुकीपासूनच नाराज होते. त्यांचा पराभव किरण सामंत यांनी केला आणि स्वकीयांनीच त्यांच्यावर टीका आणि आरोप केल्याने ते नाराज होते. त्यांनी विनायक राऊत यांच्याबाबत देखील नाराजी व्यक्त करताना त्यांच्यामुळे आपला पराभव झाल्याची खंत बोलून दाखवली होती. पण याच्याआधी ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. तारखाही समोर आल्या होत्या. मात्र ऐन वेळी ऑपरेश टायगर सुरू झाले आणि सगळीच समिकरणं बदलली.
ऑपरेशन टायगरमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची शिकार करण्यात आली असून राजन साळवींसारखा बुरज आपल्या किल्ल्यात ओढून घेण्यात शिंदे यशस्वी झाले आहेत. साळवींच्या प्रवेशाने शिंदे सेनेला हत्तीचे बळ मिळणार आहेच. शिवाय शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यासह उदय सामंत आणि भाजपला देखील शह दिला आहे.
भाजप साळवींचा प्रवेश घडवून राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत होती. यामुळे उदय सामंत यांना आपल्याच जिल्ह्यात तगडे आव्हान निर्माण झाले असते. यासाठी रणनीती आखली जात होती. असे झाले असते तर उदय सामंत यांना ते जड गेले असते अशीच चर्चा सध्या रत्नागिरीत सुरू होती. तर उदय सामंत यांचा उद्याचा उदय अशी बातम्या आल्यानेच शिंदे यांनी उदय सामंत यांना शिवसेनेतच प्रतिस्पर्धी उभा केला आहे.
साळवींच्या प्रवेशाने शिंदे शिवसेनेची ताकद वाढली असलीतरीही प्रश्न राहतो तो सामंत-साळवींचे सुत जुळणार का? कट्टर विरोधक सेनेच्या वाढीसाठी एकत्र येणाक का? असेच सवाल आता केले जातायत.
साळवींचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून संघटन कौशल्य मोठं आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा शिंदे शिवसेनेला होऊ शकतो. तर याचे आवाहन उद्धव सेनेसमोर असणार आहे. साळवींनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडताच उबाठा शिवसेनेच्या अनेक शिलेदारांनी मशाल खाली ठेवत धनुष्यबाण हाती घेतले आहे. यामुळे उद्धव सेना जिल्ह्यात कमकूवत झाली आहे. तर नवी पिढी आता या कसलेल्या नेत्यांना कसे तोंड देतात हे पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.