Sahyadri Sugar factory : सह्याद्रीतील पराभवाने 'मनो-धैर्य' खचलं; घोरपडे-कदमांच्या वादाने तालुक्यातील भाजपही दुभंगली

Sahyadri Sugar factory : अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकहाती सत्ता कायम राखली आहे.
Manoj Ghorpade - Dhairyasheel Kadam
Manoj Ghorpade - Dhairyasheel KadamSarkarnama
Published on
Updated on

Karad News : अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकहाती सत्ता कायम राखली आहे. 21-0 असा विरोधकांचा धुव्वा उडाल्याने सत्तांतराचे स्वप्न अधुरे राहिले. या निकालामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचलेला बाळासाहेब पाटील यांचा गट पुन्हा चार्ज झाला आहे. तर भाजप आमदार मनोज घोरपडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचा गट सहा महिन्यात पुन्हा खचल्याचे दिसून येत आहे.

जवळपास 32 हजार सभासद असलेल्या सह्याद्री साखर कारखान्यावर मागील अनेक वर्षांपासून बाळासाहेब पाटील यांची एकहाती सत्ता आहे. बहुतांश निवडणुका बिनविरोध किंवा एकतर्फीच झाल्या. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाला. भाजप नेते मनोज घोरपडे यांनी त्यांना आस्मान दाखवले. त्या दिवसापासून कारखाना जिंकून पाटील यांना दुसरा दणका देण्यासाठी घोरपडेंनी बाह्या सरसावल्या. यासाठी बाजार समिती पॅटर्न राबवून सर्व विरोधकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शड्डू ठोकायचा असे ठरवण्यात आले.

Manoj Ghorpade - Dhairyasheel Kadam
Sahyadri Sugar Factory Election : सह्याद्री 'भाजपनेच' जिंकवून दिला; 'त्याच' क्षणी लागले होते बाळासाहेबांच्या विजयाचे स्टेटस

त्यासाठी आमदार मनोज घोरपडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ असे सगळे एकत्र आले होते. विरोधी गोटात चालेल्या या घडामोडींमुळे निवडणुकीचे वातावरण तापले होते. सत्ताधारी आणि विरोधी गट अशीच दुरंगी लढत होईल, अशी चिन्हे होती. त्यासाठी विरोधकांच्या जोर-बैठकाही सुरू होत्या. पण अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्यात विसंवाद झाला आणि निवडणुकीत तिसरे पॅनेल पडले. तिथूनच बाळासाहेब पाटील यांना निवडणूक सोपी जाणार अशा चर्चांना सुरुवात झाली आणि झालेही तसेच.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांची ताकद एकवटल्यास काय होऊ शकते याचा प्रयत्न तालुक्याला आला होता. कराड उत्तरमधून भाजपच्या माध्यमातून उमेदवारीसाठी मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम हे दोघेही इच्छुक होते. पण उमेदवारीची माळ घोरपडेंच्या गळ्यात पडली. मात्र तिरंगी लढत झाल्यास त्याचा थेट फायदा बाळासाहेब पाटील यांनाच होतो हा इतिहास लक्षात घेत सगळे एकवटले. निवडणुकीत एकास एक लढत झाली अन् परिवर्तन झाले होते. या पावलावर पाऊल टाकत मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम एकत्र येणार होते. पण तसे होऊ शकले नाही.

या निकालानंतर आमदार घोरपडेंनी संयमी प्रतिक्रिया दिली. पण धैर्यशील कदम यांनी पराभवाचे खापर घोरपडे आणि उंडाळकरांवर फोडले. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर सह्याद्रीचा विजय सुध्दा सोपा होता. परंतु अहंकारी व अडेलतट्ट नेतृत्वामुळे तसेच काही लोकांना आमच्यात मेळ बसू द्यायचा नव्हता. त्यामुळे विरोधात दोन पॅनेल झाले. परिणामी सभासदांनी विद्यमान व्यवस्थापनाला स्विकारले, असे कदम म्हणाले.

Manoj Ghorpade - Dhairyasheel Kadam
Sahyadri Factory Result : ‘सह्याद्री’तील मानहानीकारक पराभव भाजप जिल्हाध्यक्षांच्या जिव्हारी; म्हणाले, ‘अहंकरी नेतृत्व, काहींना आमच्यात मेळ बसू द्यायचा नव्हता’

आता निवडणूक प्रक्रिया संपली आहे. पण या काळात एकाच पक्षात असून एकमेकांवर केलेली चिखलफेक, निवडणुकीनंतर फोडलेले खापर यामुळे तालुक्यातील भाजपमध्येही पुन्हा दोन गट पडले आहेत. त्यामुळे मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांचेही 'मनो-धैर्य' खचलेले आणि गणित विस्कटलेले आहे असेच म्हणावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com